५ जून हा आंतर्राष्ट्रीय पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. दुसर्या महायुद्धानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण आणि वेगाने झालेले शहरीकरण याचा परिणाम म्हणून तिथली प्रदूषणाची समस्या गंभीर होत गेली. चंगळवाद, भौतिक सुखलोलुपता व त्यासाठी लागणारी आधुनिक उपकरणे यांमुळे उर्जेची गरज वाढत गेली. त्यातूनच कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन वाढले. पृथ्वी भोवतालचा संरक्षक ओझोन थर विरळ होऊ लागला. आंतर्राष्ट्रीय समुदायाला याची जाणीव झाल्यामुळे पर्यावरणविषयक चर्चांना गती मिळाली. त्याचाच एक भाग म्हणून आपण हा दिवस साजरा करतो.
पर्यावरणशास्त्राचा आवाका फार मोठा आहे. अनेक खगोलीय, भौतिकीय व रासायनिक घटना, हवामानातील बदल, नैसर्गिक उलथापालथी पर्यावरणावर परिणाम करत असतात. त्यासाठी सतत जागृत रहावे लागते. ऋग्वैदिक काळातसुद्धा पर्यावरणसंबंधी चेतना विद्यमान होती असे अनेक मंत्रांमधून दिसून येते. निसर्गाचे सारे वरदान लाभलेला मनुष्य हा सृष्टीचा सर्वोत्तम प्राणी आहे आणि म्हणूनच त्याची जबाबदारीही मोठी आहे. धरती-आकाश आपले माता-पिता आहेत, कारण ते आपले संगोपन व संरक्षण करतात. आपणसुद्धा सुपुत्र-सुपुत्री बनून त्यांचे संरक्षण करायला हवे.
आज आपण भूमातेशी असलेला आपला भावनात्मक व संवेदनात्मक संबंध विसरत चाललो आहोत. तिचा सातत्याने जेवढा उपभोग घेता येईल तेवढा घेत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकास घडवता घडवता भूमातेला आपण भकास करत आहोत. ओरबाडून घायाळ करत आहोत. म्हणूनच निसर्गचक्राचे संतुलन बिघडले असेल का ?
माहितीदाता : श्री. सोमनाथ देविदास देशमाने, निवृत्त प्राध्यापक, अहमदनगर, भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६
अंतिम सुधारित : 8/1/2020
जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने WOTR प्रस्तु...