आपण राहत असलेल्या सभोवताली बहुतेक सर्व समस्यांचे मूळ हे पर्यावरणविषयक प्रवृत्तींमध्येच दडलेले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वप्रथम समाजाची पर्यावरणाबाबतची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असून ती देशाची भविष्यातील सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातच पर्यावरण रक्षणाबाबत गोडी व जागरूकता निर्माण केल्यास भविष्यात त्याचा निश्चितच चांगला परिणाम अनुभवावयास मिळेल. नेमके हेच लक्षात घेऊन केंद्र शासनाने देशातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरीत सेना या योजनेंतर्गत ‘इको क्लब’ स्थापन करण्यासंबंधीचा कार्यक्रम मंजूर केला.
या योजनेचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाबद्दल शिक्षण देणे हा असून त्यांना परिसंस्था, त्यांचे परस्परांवरील अवलंबित्व व त्याच्या अस्तित्वाची गरज यांचे शिक्षण, प्रत्यक्ष भेटी व प्रात्यक्षिकांद्वारे देणे तसेच त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयक समस्यांबाबत शास्त्रीय चौकस बुद्धी निर्माण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यामध्ये त्यांचा सहभाग प्राप्त करून घेणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात 250 इको क्लब स्थापन करावयाचे आहेत. ही योजना 100 टक्के केंद्र पुरस्कृत असून राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राबविली जाते.
संचालक, सामाजिक वनीकरण, पुणे यांची योजनेचे स्टेट नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भारती विद्यापीठ पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्था, पुणे या संस्थेची रिसोर्स एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय हरीत सेनेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयक शिक्षणाचा प्रथम हाती स्वयं-अनुभव प्राप्त व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक राष्ट्रीय हरीत सेना उद्यान (एन.जी.सी. पार्क) उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या ताब्यात असलेल्या रोपवाटिकेत निसर्ग पाऊलवाटा निर्माण करण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या वृक्षांवर माहितीफलक लावण्यात आले असून त्या भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची चित्रे मुलांच्या पर्यावरणविषयक ज्ञानात भर घालतात. याशिवाय या उद्यानात निर्माण करण्यात येणारे फुलपाखरु उद्यान, औषधी वनस्पती बाग, नक्षत्रवन इत्यादी संकल्पनामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होईल. या उद्यानात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान उदा. सौरऊर्जा प्रकाशयंत्रे, गांडूळखत निर्मिती प्रकल्प याबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणपूरक व साहसी खेळ यांचाही अंतर्भाव असेल. अशारितीने एन.जी.सी. पार्क विद्यार्थ्यांसाठी निसर्गात राहून त्याच्याबद्दल शिकण्याचे एक हक्काचे ठिकाण निर्माण झाले आहे.
श्रद्धावने
वृक्षराजीचे संवर्धन होण्यासाठी लोकांच्या मनातील ईश्वराबाबतच्या श्रद्धेचा उपयोग करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी श्रद्धावन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावाचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी हरीत सेनेच्या सहकार्यातून व संनियंत्रणातून श्रद्धावन अंतर्गत विशिष्ट प्रजातींची रोपवने हाती घेण्यात आली आहेत. सुरुवातीस राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एक श्रद्धावन निर्माण करण्यात आले असून कालांतराने त्याची व्याप्ती वाढविण्याचा संकल्प आहे.
राष्ट्रीय हरीत मानांकन (ग्रीन रेटींग)
सुदृढ पर्यावरण रक्षणाच्या दिशेने राष्ट्रीय हरीत सेना योजनेंतर्गतच्या शाळांची वाटचाल व्हावी, या हेतूने त्यांना गुण देण्यात येऊन त्यांचे मानांकन करण्यासाठी तारांकित शाळा ही पद्धत सुरु करण्यात येत आहे. ज्या शाळा या पद्धतीत सर्व निकष पूर्ण करतील त्यांना पंचतारांकित हरीत शाळेचा दर्जा देण्यात येईल. या मानांकन पद्धतीमुळे शाळांमध्ये एक निकोप स्पर्धा निर्माण होऊन त्यांचे पर्यावरणविषयक विचार व आचारात जाणीपूर्वक बदल होईल.
उन्हाळ्याच्या सुट्टीतील विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा व त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील सर्व इको क्लबना त्यांच्या विद्यार्थ्यांमार्फत विविध वृक्ष प्रजातीच्या बिया गोळा करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार गोळा करण्यात येणाऱ्या बियांपैकी काही बिया शाळेमध्ये सीड बँक तयार करण्यासाठी राखून ठेवून उर्वरित बियांची इको क्लबच्या विद्यार्थ्यांमार्फत सुयोग्य जागी पेरणी करण्यात येते. तसेच जास्तीत जास्त प्रजातीच्या बिया गोळा करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम तीन क्रमांकाच्या शाळांचा सत्कार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येतो.
-विभागीय माहिती कार्यालय,
कोकण विभाग, नवी मुंबई
माहिती स्रोत: महान्यूज, सोमवार, १३ एप्रिल, २०१५.
अंतिम सुधारित : 10/7/2020