অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

असे करा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन

असे करा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन

या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अनेक ठिकाणी कमी आहे. तेव्हा कमी पाण्यामध्ये पिकांचे व्यवस्थापन खालील प्रकारे केल्यास उत्पादनातील घट टाळता येते. जिरायती क्षेत्रासाठीही याचा उपयोग होईल. 

रब्बी ज्वारी

1) पीक उगवणीनंतर 8-10 दिवसांनी पहिली विरळणी त्यानंतर 8-10 दिवसांनी दुसरी विरळणी करून रोपांची संख्या हेक्‍टरी 1.20 ते 1.35 लाख झाडे योग्य ठेवावी.
2) कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर 3, 5 व 8 आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात. आवश्‍यकतेनुसार 1 ते 2 निंदण्या केल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीवर ओलावा टिकून राहील आणि तणांचा बंदोबस्त होईल.
3) रब्बी हंगामात जमिनीतील जवळपास 60-70 टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तूर काटके इ.चा वापर ज्वारी पेरल्यापासून 50 दिवसांच्या आत आच्छादन म्हणून करावा.
4) शक्‍य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
5) संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकच पाण्याची सोय असल्यास पीक 35-40 दिवसांचे असताना किंवा पीक पोटऱ्यात असताना पाणी द्यावे.
6) पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्टा पद्धतीने द्यावे.

करडई

1) पीक उगवणीनंतर 25-30 दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर 20 सेंमी ठेवावे.
2) पीक उगवणीनंतर 25-30 आणि 45-50 दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात.
3) पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीद्वारे द्यावे.
4) सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळीनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून द्यावी. सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे.
5) सुरवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा.
6) पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येते वेळेस व बोंडात करडई भरण्याची) पाणी द्यावे.

गहू

1) गव्हाची एकेरी पेरणी करावी.
2) वेळेवर आंतरमशागत केल्यास तणाचा नायनाट होतो, ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
3) पेरणीनंतर 30-40 दिवसांच्या आत गरजेप्रमाणे 1-2 वेळा खुरपणी करावी.
4) आच्छादनाचा वापर करावा.
5) कमी प्रमाणात ओलिताची सोय असेल, तर पाण्याच्या पाळ्यांचे खालीलप्रमाणे नियोजन करावे.
6) पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
चौकट - compose/25-11-2014/agr-cs6

हरभरा

1) तीन आठवड्यांच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
2) जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो. एखादे पाणी देणे शक्‍य असल्यास पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
3) जिरायती हरभऱ्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट किंवा दोन टक्के युरियाची फवारणी करावी. त्यानंतर दुसरी 15 दिवसांनी फवारणी करावी.
4) तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.

ऊस

1) हलक्‍या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते. जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचऱ्याद्वारे वाया जाते. अशा जमिनीत सर्वसाधारण पाच हेक्‍टर सेंमीपर्यंत पाणी द्यावे व दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
2) पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सऱ्यांमध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून घ्यावा.
3) पाणी नेहमी एकाआड एक सरीमध्ये द्यावे.
4) पट्टा पद्धतीने व जोडओळ पद्धतीने उसाची लागवड करावी.
5) हेक्‍टरी 8-10 टन उसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळा अथवा पॉलिथीन पेपरचा वापर करावा.
6) अती अवर्षण काळात पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (10 टक्के) 100 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात 10-12 दिवसांच्या अंतराने 2-3 फवारण्या कराव्यात.
7) पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा.
8) तणांचा बंदोबस्त करावा.
9) उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवणार असेल, तर अगोदर नोव्हेंबरपासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे. शक्‍य तेथे आंतरमशागत करावी. पिकाला सिंगल सुपर फॉस्फेटचा 25 टक्के हप्ता अधिक द्यावा.
- डॉ. एस. बी. पवार, 9422178982.
(कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate