অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेतीमध्ये जपली आदर्श प्रयोगशीलता

पोलीस दलातील जबाबदारी सांभाळत यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील रवींद्र जाधव यांनी शेतीक्षेत्रातही प्रयोगशीलता जपली आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण व्हावा, असा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी या भागात व्यावसायिक पीकपद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी देखील ते सरसावले आहेत.

पोलिसींग आणि शेती



यवतमाळ पोलीस दलात 1992 साली रवींद्र हे भरती झाले. जिल्हा विशेष शाखेत त्यांची नियुक्‍ती आहे. कर्तव्याचे ठिकाणी असलेल्या यवतमाळ पासून शेती असलेली ब्राम्हणवाडा हे अंतर 28 किलोमीटर आहे. रवींद्र हे पोलीस दलात असल्याने त्यांच्यावर जबाबदाऱ्या अधिक असतात, परंतू नोकरी सांभाळत रविवारी व सुटीच्या दिवशी ते शेती व्यवस्थापन करतात. या शेतीच्या इतर दिवशीच्या व्यवस्थापनासाठी बारमाही तिघांची नेमणूक आहे..

शेतीला जोडली शेती



रवींद्र यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती होती. त्यानंतर रवींद्र यांनी दहा एकर शेती खरेदी केली. शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी शेतीचा विस्तार करण्याचे ठरविले. सुरवातीला हे संपूर्ण क्षेत्र कोरडवाहू होते. बोअरवेल व विहीर खोदत हे क्षेत्र सिंचनाखाली आणले गेले. बोअरवेलसाठी 80 हजार रुपये तर विहिरीसाठी 65 हजार रुपयांचा खर्च आला. या दोन्ही स्त्रोतांना पाणी असल्यामुळे पिकाच्या पाण्याची सोय झाली आहे. विदर्भाच्या उन्हाचा तडाखा सर्वदूर मान्य आहे परंतू मे महिन्यातही हे जलस्त्रोत कमी पडले नाही.

शेतीत प्रयोगशीलता



वीस एकरांपैकी चार एकरावर ऊस, दोन एकरावर पपई, अर्धा एकर मिरची, साडेतीन एकरावर सोयाबीन यासोबतच उर्वरित कपाशीची लागवड आहे. सोयाबीनची काढणी झाली असून एकरी साडेसात क्‍विंटलची उत्पादकता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दोन तोड्यात 27 क्‍विंटल कापूस निघाला आहे. गेल्यावर्षी सहा एकरात कापसाची 80 क्‍विंटलची उत्पादकता मिळाली होती. यावर्षी पहिल्यांदा पपईची लागवड त्यांच्याद्वारे करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांद्वारे जे पीक कमी प्रमाणात होते त्याच पिकाच्या लागवडीवर रवींद्र यांचा भर राहतो. शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहतो. गेल्यावर्षी उसात बीट हे आंतरपीक घेण्याचा प्रयोग त्यांनी केला. उत्पादीत बीटची त्यांनी स्थानिक बाजारपेठेत विक्री केली. उसाची लागवडही त्यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्याकरीता लागणारे बेणे बेलोरा येथून खरेदी केले.

ऊस लागवडीचा प्रयोगही अशाप्रकारे त्यांनी पहिल्यांदाच केला. सोयाबीन काढणीनंतर रबी हंगामात गहू लागवडीचे नियोजन केले आहे. त्याकरीता आंतरमशागतीचे कामही पूर्णत्वास गेल्याची माहिती त्यांनी दिली. यवतमाळ येथील ओळखीतील प्रशांत किनकर यांच्याकडून शेती व्यवस्थापनाची माहिती वारंवार रवींद्र घेतात. त्यांच्याच मार्गदर्शनात शेतीक्षेत्रात आजवरचा पल्ला त्यांना गाठता आला.

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्‍वास रुजविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात दर शुक्रवारी शेतकरी बाजार भरविला जातो. त्या ठिकाणी देखील रवींद्र यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी ठेवला. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने अशाप्रकारे शेतीमध्ये प्रयोगशीलता जपत बिटचे उत्पादन घेतल्यामुळे प्रभावीत होत जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी बाजार पाहणीच्यावेळी उपक्रमशीलतेचे कौतुक केले. नोकरी सांभाळून शेतीतही प्रयोगशीलता जपत रवींद्र जाधव यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

शब्दांकन : चैताली बाळू नानोटे
निंभारा, पो. महान, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/5/2021



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate