भारताचा देश पातळीवरील कारभार हिंदी आणि इंगजी या भाषेत पाहिला जात असला तरी भारतीय राज्यघटनेने काही प्रांतीय भाषांना मान्यता दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेत अधिसूची-8 मध्ये भारतीय प्रमुख भाषांचा समावेश केला आहे. आसामी, बंगाली, गुजराती, हिन्दी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दु अशा एकूण अठरा भाषांना प्रांतीय भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. आता एकूण बावीस भाषांना मान्यता आहे. पैकी तमिळ, संस्कृत, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र भारतात इतरही भाषा बोलल्या जातात.
भारताच्या भाषा. बोलीभाषा आज 1500 पर्यंत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत 1800 होत्या. दिवसेंदिवस बोली भाषा नष्ट होत आहेत. अनेक आदिवासी भारतात वास्तव्य करतात आणि त्यांच्या स्वतंत्र बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात धार्मिक, पुरातत्वीय, नैसर्गिक, वास्तु आदी वर्गवारी करावी लागेल. चार धाम यात्रा, बारा ज्योतिर्लिंगे, कुंभमेळे (हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, नाशिक-त्र्यंबकेश्वर), अष्टविनायक, प्रमुख धार्मिक पीठे : शृंगेरी, द्वारका, पुरी, जोशीमठ, कांचीपुरम,अहोबिलम, मेलकोटे, उडुपी आदी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत.वुलर, डल (जम्मू- काश्मीर), पुष्कर, सांभर, जयसमंद, सिलिसाड, पिचोला (राजस्थान), नारायण, नलसरोवर (गुजरात), चिल्का (ओडिशा), पुलिकत, कोल्लेरू (आंध्र प्रदेश), लोणार (महाराष्ट्र), बेब्मनाड, अष्टमुडी, कायनकुलम (केरळ), लोकटाक (मणिपूर) आदी सरोवरांचे पर्यटन हजारो पर्यटक करत असतात.
युनेस्कोने गौरविलेली भारतातील बत्तीस जागतिक वारसा ठिकाणे आहेत: आग्रा किल्ला, ताजमहाल, फत्तेपूर सिक्री (उत्तर प्रदेश), अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, घारापुरी लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनस (महाराष्ट्र), महाबलिपुरम, बृहदिश्वर मंदिर- तंजावर (तामिळनाडू), सूर्य मंदिर- कोणार्क (ओडिशा), ऐतिहासिक चर्च – ओल्ड गोवा (गोवा), हंपी, पट्टदकल येथील मंदिरे (कर्नाटक), खजुराहोची प्राचीन मंदिरे, सांची येथील स्तुप, ऐतिहासिक भित्तिचित्र- भीमबेटका (मध्यप्रदेश), हुमायुनची कबर, कुतुबमिनार, लाल किल्ला (दिल्ली), भारतातील पर्वतीय रेल्वे (निलगिरी, तामिळनाडू, दार्जिलिंग, पश्चिम बंगाल), महाबोधी मंदिर- बुध्दगया (बिहार), चंपानेर – पावागड, राणी की वाव (गुजरात), जंतर मंतर – जयपूर , राजस्थानातील किल्ले, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान (राजस्थान), काझीरंगा, मानस वन्यप्राणी अभयारण्य (आसाम), सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (पश्चिम बंगाल), नंदादेवी व पुष्पघाटी (उत्तराखंड), पश्चिम घाट (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू), ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान (हिमाचल प्रदेश).
भारतीय लोकसंगीत हे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण कर्नाटकी म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते.पंजाबचा भांगडा, आसामचा बिहु, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडचा चाहु, गुजरातचा गरबा आणि दांडिया, राजस्थानचा घुमार आणि महाराष्ट्राचा लावणी हे आठ लोकनृत्य मिथक कथांवर आधारीत आहेत.
इंडियन नॅशनल अॅकेडेमी ऑफ म्युझिकने ज्या लोकनृत्यांना अभिजात दर्जा दिला आहे. नृत्य, नाट्य आणि लोकसंगीत या तिघांचा मेळ ज्यात असतो, ते नृत्य म्हणजे तमिळनाडूचे भरतनाट्यम, उत्तर प्रदेशचे कथक, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम, आंध्र प्रदेशचे कुचिपुडी, मणिपुरचे मणिपुरी, ओडिशाचे ओडिशी आणि आसामचे सत्रिया हे अभिजात नृत्य आहेत.
गुजरातचे भवाई, पश्चिम बंगालचे जत्रा, उत्तर भारतातील नौटंकी आणि रामलिला, महाराष्ट्राचा तमाशा, आंध्रप्रदेशाचा बुराकथा, तमिळनाडूचा तेरूकुट्टू आणि कर्नाटकचा यक्षगाण हे अभिजात नाट्य आविष्कार आहेत.
भारतीय प्राचीन साहित्य हे संस्कृत भाषेत आढळून येते. त्यापूर्वी कोणत्या भाषेत साहित्य लिहिले जात होते हे अज्ञात आहे. रामायण आणि महाभारत हे प्राचीन महाकाव्ये आहेत. इलियड सोबत हे दोन महाकाव्ये जागतिक महाकाव्ये समजली जातात. असे एकूण तीन महाकाव्ये. कालिदासाचे शाकुंतल नाटकही अभिजात आहे. कामसूत्र हा सुद्धा एक प्राचीन महत्वाचा ग्रंथ आहे. भक्त संप्रदायातले अनेक संतकवी आजही प्रख्यात आहेत. कबीर, तुलसिदास, गुरूनानक आदी. विसाव्या शतकातील रविंद्रनाथ टागोर या कवीवर्यांना गितांजली या काव्याबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला.
भारतातील ठळक ऐतिहासिक पुरूषांची नावे घ्यायची झाली तर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर, विवेकानंद आदींचे नावे सांगता येतील..हिमालय, विंद्य, सह्याद्री, पूर्व घाट, पाश्चिम घाट, सातपुडा अशा काही महत्वाच्या पर्वत रांगा भारतात असून गंगा, यमुना, ब्रम्हपुत्रा, गोदावरी, कृष्णा, चंद्रभागा, कावेरी, नर्मदा, तापी, कोसी, हुगळी, सतलज, झेलम आदी अनेक प्रमुख नद्या भारतातून वाहतात आणि भारतीय शेतीव्यवस्था समतोल ठेवतात.
लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/18/2020
भारतात जन्माला आलेला एक खेळ.
या विभागात कृषी मंत्रालय, भारत सरकार यांचे विवध वि...
औरंगाबाद जिल्ह्यातील वरझडी येथील भारत पठाडे यांनी ...
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत...