जुलाबाचे मुख्य कारण पोटात विषारी जीवाणू जाणे हेच असते. अस्वच्छता आणि दूषित पाणी यामुळे हे जीवाणू पोटात जातात. बाळ खाली पडलेली खेळणी किंवा इतर काही वस्तू तोंडात घालते. यामुळे खालची घाण पोटात जाते व बाळाला जुलाब होऊ लागतात. काही लोक दाताचे जुलाब म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. पण दात येण्याचा व जुलाबाचा काहीही संबंध नसतो. अशा जुलाबातून शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे मृत्यू ओढवू शकतो.
अतिसार म्हणजे जुलाब होणे. जुलाब होणाऱ्या मुलाला भरपूर पातळ पदार्थ दयावेत. शहाळ्याचे पाणी दयावे. फळांचा ताजा रस दयावा. भाताची कांजी, भाताची पेज, भाज्यांचे सुप, वरण असे पदार्थ दयावेत. अंगावरचे दूध चालू ठेवावे.सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे बाळाला जल संजीवनी दयावी. एवढे करून फरक न पडल्यास डॉक्टरांना दाखवावे.
अतिसारावर उपयोगी पडणारे हे एक पेय आहे. एक लिटर उकळून गार केलेले पाणी घेऊन त्यात आठ चमचे साखर, चार चिमटी मीठ आणि चवीपुरते लिंबू हे सर्व एकत्र करून घ्यावे.हि जल संजीवनी शरीराच्या बहरत पडलेले पाणी भरून काढण्यासाठी उपयोगी पडते.
स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020