शेतीच्या आणि खेड्यांच्या विकासाबरोबरच पर्यावरणसंवर्धनाच्या नावाखाली होत असलेल्या निसर्गातल्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे पक्षी आणि त्यांचे नैसर्गिक अधिवास संकटात येत आहेत. शेतीमध्ये विविध पिकांवर सतत किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. हे टाळून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी पिकांवर मोठ्या प्रमाणात विषारी कीटकनाशके फवारली जातात. पिकांवरील किडी खाणार्या पक्ष्यांवर या कीटकनाशकांचा विपरीत परिणाम होत असून ही बाब पक्ष्यांची संख्या घटण्यास कारणीभूत ठरत आहे.
वारंवार पडणारे दुष्काळ, पर्यावरणाचा सतत होत असलेला र्हास, हवामानातील बदल, नापिकी, शेतकरी आत्महत्या अशा समस्यांवर मात करण्यासाठी माळरानावर सरसकट जल-मृद्संवर्धनाची कामे केली जातात. लवकर वाढणार्या झाडांची लागवड केली जाते. सिंचनाच्या सुविधा निर्माण करून बागायती पिके घेण्यावर भर दिला जातो. परिणामी, एके काळची जैवविविधतासंपन्न माळराने आता पूर्वीसारखी पक्ष्यांच्या अधिवासासाठी खुली न राहता आक्रसू लागली आहेत. त्यामुळे माळरानावर आढळणार्या अनेक जीवजाती दुर्मीळ होत चालल्या आहेत. माळढोक पक्षी हे त्यांपैकीच एक उदाहरण आहे.
गावातील स्वच्छतेचे महत्त्व महात्मा गांधींजींपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेकांनी सांगितले आहे. पूर्वी ग्रामीण भागातील मृत जनावरे गावाबाहेर माळरानावर टाकली जात असत. आता बहुतांश गावांमध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा खणून त्यात त्यांना पुरले जाते. गावाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने ही चांगली बाब असली, तरी त्यामुळे गिधाडांसारख्या पक्ष्यांना त्यांच्या हक्काच्या अन्नापासून वंचित राहावे लागत आहे. अशा कितीतरी बाबींतून कळत-नकळतपणे आपल्याकडून पक्ष्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या अधिवासामध्ये हस्तक्षेप केले जात आहेत.
शेतीच्या आणि खेड्यांच्या विकासाबरोबरच पर्यावरणसंवर्धनाचे कार्यक्रम हाती घेताना स्थानिक पक्ष्यांना किंवा त्यांच्या अधिवासांना बाधा पोहोचू नये म्हणून विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. याकरिता वृक्षाच्छादित हिरवागार परिसर म्हणजे पशुपक्ष्यांच्या विविधतेने संपन्न असलेला परिसंस्थेचा भूभाग आणि खुरटी झुडपे असलेले गवताळ माळरान म्हणजे पडीक, नापीक किंवा बंजड (ओसाड) जमीन असा जो समज आहे; तो सर्वप्रथम दूर करायला हवा. स्थानिक परिसंस्था आणि जैवविविधता या गोष्टी विचारात घेऊनच वृक्षलागवड करायला हवी आणि वृक्षलागवड करताना त्या-त्या भागात नैसर्गिकरीत्या आढळणार्या स्थानिक देशी वनस्पतींनाच प्राधान्य द्यायला हवे. याबरोबरच शेतीमध्ये कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत आणि कीटकनाशकविरहित एकात्मिक कीड-व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करायला हवा. चिमण्यांपासून गिधाडांपर्यंत सर्व पक्ष्यांच्या अन्नपाण्याची नैसर्गिकरीत्या सोय होईल अशी व्यवस्था गावस्तरावर निर्माण करायला हवी.
एकूणच आपली जीवनशैली, उपजीविकेची साधने आणि विकास योजना हे सारे स्थानिक पक्षी, त्यांची विविधता आणि त्यांचे अधिवास जोपासणारे हवे.
माहिती स्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 6/27/2020
आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापास...
निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक कलाविष्कारांकड...
स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या...
पक्ष्यांविषयी मनोगत.