অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फळबागेसाठी संरक्षित पाण्याची सोय कशी करावी

फळबागेसाठी संरक्षित पाण्याची सोय कशी करावी

  1. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने डोंगर-उतारावरील आंबा आणि काजू फळबागांच्या पाणी व्यवस्थापनासाठी "कोकण जलकुंड' तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  2. या जलकुंडासाठी प्लॅस्टिकचे (200 जीएसएम) अस्तरीकरण केलेले असते. अशा खड्ड्यांमध्ये निव्वळ पावसाचे पाणी साठवून त्याचा कार्यक्षम वापर पावसाळ्यानंतर फळपिकांना करण्यात येतो.
  3. नवीन आंबा किंवा काजू लागवडीत दर दहा झाडांमध्ये जमीन डोंगरउताराची व खडकाळ असल्यास 4 x 1 x 1 मी. किंवा 2 x 1 x 2 मी. या आकाराचा खड्डा खोदावा. अशा खड्ड्यांना व्यवस्थित चौकोनी आकार द्यावा.
  4. जांभ्या जमिनीच्या खड्ड्यातील बारीक दगडांची अणकुचीदार टोके काढून टाकावीत आणि खड्ड्याचा तळ व चारही भिंतींवर अस्तराच्या स्वरूपात भातपेंढ्याचा सुमारे 15 सें. मी. जाडीचा थर पसरावा. पेंढा पसरण्यापूर्वी शिफारशीत कीटकनाशक पावडर खड्ड्यात पसरून द्यावी. त्यानंतर खड्ड्याच्या आकारमानानुसार शिफारशीत प्लॅस्टिकचे अस्तरीकरण करावे.
  5. अस्तरीकरण करताना प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे, जेणेकरून त्यास घड्या पडणार नाहीत. खड्ड्याच्या काठापासून 20 सें. मी. अंतरावर 30 x 30 सें. मी. आकाराचा सभोवताली चर खोदून त्यात प्लॅस्टिक पेपरची खड्ड्याबाहेरील वाढीव बाजू गाडून मातीने व्यवस्थित झाकून, माती पायाने व्यवस्थित घट्ट दाबावी व खड्ड्याच्या सभोवताली मातीचा उंचवटा तयार करावा, यामुळे खड्ड्याच्या आजूबाजूने वाहणारे पावसाचे मातीमिश्रित गढूळ पाणी खड्ड्यात न येता खड्डा पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरून राहील.
  6. खड्ड्यामध्ये साठविलेले पाणी पावसाळ्यानंतर उर्वरित काळासाठी (15 नोव्हेंबर ते 15 जून) दहा आंबा किंवा काजू कलमांना प्रति आठवड्यास, प्रति झाडास दहा लिटर या प्रमाणात पुरेसे होते. अस्तरीत खड्ड्यातील पाण्याचा बाष्पीभवनाद्वारा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी बांबूच्या पट्ट्या आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा, यामुळे मोकाट जनावरे किंवा वन्य प्राणीदेखील तळ्यातील पाणी पिणार नाहीत.
  7. खड्ड्यातील पाणी काढल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर 100 मि. लि. नीम/ उंडी तेल ओतावे. अशा तेलाच्या तवंगामुळे बाष्पीभवनाद्वारा होणारा पाण्याचा ऱ्हास मर्यादित राहतो. तेलाच्या उग्र वासामुळे, तसेच कीटकनाशक गुणधर्मामुळे मोकाट जनावरे पाणी पीत नाहीत; उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत.

 

संपर्क- 02358 -280558 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी.

स्त्रोत : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate