অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तूर, हरभरा डाळनिर्मिती

शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नाही ही प्रत्येक शेतकऱ्याचीच समस्या असते. चांदूर (ता. जि. अकोला) येथील जय वळेखण स्वयंसहायता शेतकरी बचत गटाने याच समस्येवर उपाय शोधला. हरभरा, तूर बाजार समितीत न विकता त्यावर प्रक्रिया करीत डाळी तयार करून थेट ग्राहकांना विक्री सुरू केली आणि नफ्याचे मार्जिन वाढवले आहे.

चांदूर (ता. जि. अकोला) येथील अमरदीप डाबेराव बी.एस्सी. ऍग्री. पदवीधारक आहेत. ते पोस्ट खात्यात नोकरी करीत होते. मात्र, शेतीची आवड व त्यातील शिक्षण असल्याने शासकीय नोकरीला रामराम ठोकला, शेतीत पूर्ण लक्ष घातले.

पण, शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी समाधानकारक दर देत नाहीत ही समस्या होती, त्यामुळे आपणच प्रक्रिया उद्योगात उतरायचे व नफ्याचे प्रमाण वाढवायचे, असा विचार त्यांनी केला. प्रक्रिया करतानाही परिसरात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचा उपयोग होईल, असा व्यवसाय निवडण्याचे ठरले. त्यातूनच गावात जय वळेखण स्वयंसहायता शेतकरी बचत गट समूहाची उभारणी झाली.
समूहात संतोष पदमने अध्यक्ष, तर अमरदीप डाबेराव सचिव आहेत. अन्य सदस्यांत विजयसिंग डाबेराव, केशव राठोड, प्रकाश कटाळकर, आशिष डाबेराव, मंगेश निलखन, चंदूसिंग सोळंके, किसन खिरेकार, रामराव नागे आदी अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे.

मिनी डाळ मिल खरेदीपासून उद्योग सुरू


समूहातील सर्व शेतकऱ्यांकडे तूर, हरभरा आदी पिके होती. साहजिकच डाळनिर्मिती व्यवसाय करण्याचे ठरले. कृषी विभागाशी संपर्क साधून कडधान्य प्रकल्पांतर्गत योजनांची चौकशी झाली, त्यातून मिनी डाळ मिलसाठी 50 टक्के अनुदान असल्याचे समजले. अडीच लाख रुपयांचे यंत्र खरेदीही केले.

सुरवातीला पन्नास टक्के रक्कम गटातील सदस्य व उर्वरित 50 टक्के अध्यक्ष व सचिव यांनी वैयक्तिकरीत्या उभी केली. त्यासोबतच वीजजोडणी, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी शेड उभारण्यात आले. यावर सुमारे एक लाख रुपयांचा खर्च झाला. समूहाची मासिक बचत प्रति सदस्य दोनशे रुपये आहे. त्यात तीन वर्षांपासून सातत्य होते. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या खडकी शाखेत समूहाचे खाते आहे. सन 2012 मध्ये युवकांचा उद्योग सुरू झाला.

असा आहे गटाचा डाळनिर्मिती उद्योग


तूर, हरभरा डाळनिर्मिती करून अकोला शहरातील ग्राहकांना ती 10 ते 50 किलोपर्यंत घरपोच केली जाते, त्यासोबतच गव्हाची सफाईदेखील करून दिली जाते.
हरभरा 
विक्री - 300 ते 400 क्विंटल 
- किलोला 40 रुपये दर 
यंदा 
500 क्विंटल 
  • बेसनही तयार केले जाते.
  • त्याची मागील वर्षी 300 क्विंटल, तर यंदा 250 क्विंटल विक्री केली.
  • मिळालेला दर - 50 रुपये प्रति किलो
तूर - 600 क्विंटल 
- किलोला दर 65 ते 70 रु. 
यंदा 
750 क्विंटल
  • गहू सफाई

क्विंटलला 100 रुपयांप्रमाणे 
2000 क्विंटल 
यंदा 
1500 क्विंटल
मालाचे पॅकिंग करूनच विक्री केली जाते. मागील वर्षी अकोला येथे भरलेल्या धान्य महोत्सवातून व ग्राहकांना थेट विक्रीतून ही सर्व विक्री झाली. अर्थात, अकरा सदस्यांबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांकडूनही माल खरेदी करावा लागला. बाजारात तुरीला चार हजार रुपये दर प्रति क्विंटल असेल, तर शेतकऱ्याला 50 रुपये अधिक दर गटाने दिला.

डाबेराव म्हणाले, की तुरीची विक्री आम्ही बाजार समितीत केली असती, तर तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असता. मात्र, क्विंटलला सात हजार रुपये दराने डाळीची विक्री केली. त्यातील फरक हा तीन हजार रुपयांचा आहे. एक क्विंटल डाळ तयार करण्यासाठी तीनशे रुपये मजुरी लागते. पॅकिंग व वाहतूक यासाठी प्रत्येकी दहा रुपये खर्च होतो. खर्च वजा जाता किलोला 25 रुपयांपर्यंत नफा मिळतो.

समूहाला होतो लाभ


दररोज प्रक्रिया होणाऱ्या शेतीमालाची नोंद केली जाते. दरदिवशी किती शेतीमालावर प्रक्रिया झाली, त्याआधारे महिन्याअखेरीस एकूण उत्पन्नाचा ताळेबंद काढणे शक्‍य होते. सद्यःस्थितीत उत्पन्नातील वाटा वितरित करण्याऐवजी त्याचे संकलन करून भविष्यात उद्योगाची व्याप्ती वाढविण्याचा गटाचा मानस आहे. शेतीमालाचे "पॉलिशिंग' करण्याचे यंत्र देखील खरेदी करण्याचे समूहाद्वारे प्रस्तावित आहे.
हरभरा किंवा तुरीची डाळ तयार करतेवेळी क्‍विंटलमागे वीस किलो चुरी मिळते. जनावरांसाठी खाद्य म्हणून त्याचा वापर होतो. गावपरिसरातील दूध व्यावसायिक 14 रुपये प्रति किलो दराने त्याची खरेदी करतात. गावातच त्याची तीन हजार क्विंटल एवढी विक्री केली आहे. धान्य महोत्सवात सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथील एका डेअरी व्यावसायिकाने 10 क्विंटल चुरीची खरेदी केली होती. त्यांनी 50 क्विंटलची मागणी नोंदवली असून ती पाठवण्यात येत आहे. गटातील सदस्यच प्रक्रिया केंद्रावर राबत असल्याने मजुरी खर्चात बचत होण्यास मदत झाली आहे.

डाळींचे पॅकेट सुरवातीला दिले मोफत


आपल्या मालाचे मार्केटिंग कसे केले हे सांगताना डाबेराव म्हणाले, की अकोला शहर आम्हाला सहा किलोमीटरवर आहे. तेथील निवासी कॉलनींमध्ये आम्ही छोटा टेंपो घेऊन जायचो. त्यात डाळी असायच्या. जाहिरातीचे बॅनरही तयार केले होते. सुरवातीला प्रत्येक सदस्याची एक क्विंटल याप्रमाणे 10 क्विंटल डाळ वेगळी करून तिचे पाव, अर्ध्या किलोत पॅकिंग तयार केले.

ग्राहकांना ते सुरवातीला मोफत द्यायचो व आमची गुणवत्ता पाहा म्हणून सांगायचो. आमच्या मालात कोणतीही भेसळ नाही हे देखील सांगितले. अशा प्रयत्नांतूनच ग्राहक बाजारपेठ मिळवणे शक्‍य झाले.
संपर्क - संतोष पदमने - 9822641929 
अमरदीप डाबेराव - 9552405918

 

लेखक : विनोद इंगोले

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate