महाराष्ट्रातील नगर (अहमदनगर) जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक भरडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या प्रकल्पातून यंदा बाजरी व ज्वारी पिकाच्या सरासरी उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे. बाजरीचे हेक्टरी सरासरी उत्पादन साडेसहा क्विंटलवरून साडेबारा क्विंटलपर्यंत, तर ज्वारीचे सरासरी उत्पादन पाच क्विंटल 19 किलोवरून साडेचौदा क्विंटलपर्यंत पोचले आहे.
एकात्मिक भरडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात बाजरी पिकासाठी नऊ हजार, तर ज्वारी पिकासाठी 11 हजार शेतकऱ्यांकडे पीक उत्पादकतावाढ प्रकल्प राबवला. प्रकल्पांतर्गत सुमारे नऊ हजार हेक्टरवर बाजरीची, तर ज्वारीची अकरा हजार हेक्टरवर लागवड झाली होती. प्रकल्पात प्रतीहेक्टरी पीक उत्पादकता व उत्पादन वाढवणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना भरडधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभारणे, मूल्यवर्धन करणे, आदी उद्दिष्टे ठेवली जातात. या योजनेसाठी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
प्रकल्पात यंदाच्या खरीप हंगामात बाजरीसंबंधी 18 प्रकल्प राबवण्यासाठी दोन कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आला. यात 'श्रद्धा', 'सबुरी' आदी सुधारित वाणांची पेरणी करण्यात आली. एकूण व्यवस्थापनातून बाजरीचे हेक्टरी सरासरी उत्पादन साडेसहा क्विंटलवरून साडेबारा क्विंटलपर्यंत पोचले.
रब्बीत ज्वारी पिकात पाचशे हेक्टरचा एक प्रकल्पाप्रमाणे 22 प्रकल्पाअंतर्गत अकरा हजार हेक्टरवर 'अनुराधा', 'फुले यशोदा', 'फुले रेवती' या सुधारित वाणांची पेरणी झाली. त्यासाठी तीन कोटी तीस लाख रुपये खर्च केला. जिल्ह्यात एका हेक्टरमध्ये ज्वारीची पाच क्विंटल 19 किलो सरासरी उत्पादकता आहे. यंदा सुधारित वाण व सुयोग्य व्यवस्थापनातून सरासरी उत्पादन साडेचौदा क्विंटलपर्यंत पोचले असल्याची माहिती कृषी विभागातील तंत्र अधिकारी संसारे यांनी दिली.
"कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने भरडधान्याच्या उत्पादकतावाढीसाठी दर वर्षी 'एकात्मिक भरडधान्य विकास कार्यक्रम' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला. प्रकल्पातून सुधारित वाणांची पेरणी केल्याने व चांगले पीक व्यवस्थापन केल्याने उत्पादकतावाढीला मदत झाल्याने, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.'' - अंकुश माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर.
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...