पानांच्या वयानुसार प्रकाशसंश्लेषणाची क्षमता पाहिली असता असे दिसते, की पान उघडल्यापासून 30 दिवसांपर्यंत ही क्रिया वाढत जाते. 40 दिवसांपर्यंत स्थिर राहून नंतर 70 दिवसांपर्यंत ती पुन्हा कमी होत जाते. पानांची वाढ होत असताना हरितद्रव्याच्या वाढत जाणाऱ्या प्रमाणामुळे अन्ननिर्मिती वाढत जाते व साधारणतः दोन ते तीन आठवडे कायम राहते.
पानांमधील प्रकाशसंश्लेषणावर ते कोणत्या हंगामातील आहे, यावरही प्रकाश संश्लेषणाचा दर अवलंबून असतो. कारण प्रत्येक परिस्थितीत वातावरणाचा परिणाम वेगळा होत असतो, तसेच सोर्स-सिंकचे प्रमाण वेगळे असू शकते.
वातावरणातील या घटकांचा प्रत्यक्ष अन्ननिर्मितीवर परिणाम होत असूनही, सामान्यतः आपण त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकत नाही; परंतु काही ठिकाणी अलीकडे बागेवर तसेच शेताच्या बाजूने प्लास्टिक कागदांचा वापर केला जातो. अशा ठिकाणी रात्रीतील श्वसनामधून निर्माण झालेला कर्बवायू वेलीच्या भोवती कोंडून राहतो.
दिवसा सूर्यप्रकाशामध्ये कर्बवायूच्या अधिक प्रमाणामुळे अन्ननिर्मिती अधिक क्षमतेने होते. पॉलिहाऊसमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या किंवा फुलांच्या बाबतीत अशाच प्रकारे तापमान सूर्यप्रकाश व कर्बवायूच्या वाढलेल्या प्रमाणाचा उपयोग प्रकाश संश्लेषणाची क्रिया वेगाने होण्यासाठी केला जातो. त्यामुळे भविष्यामध्ये उपलब्ध सूर्यप्रकाश व कर्बवायूचा अधिक क्षमतेने वापर करून घेण्यामध्ये "प्लास्टिक कल्चर' तंत्रज्ञानाचा वापर विचारात येऊ शकतो.
द्राक्षवेलीवर अनेक प्रकारची बुरशीनाशके, कीटकनाशके फवारली जातात. यापैकी काही द्रावणांमुळे पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचण्यास अडथळा निर्माण होतो व त्याचा अन्ननिर्मितीवर काही प्रमाणात दुष्परिणाम होतो. सामान्यतः "वेटेबल पावडर' स्वरूपातील रसायनांचा अशाप्रकारचा परिणाम आपल्याला प्रत्यक्षपणे द्राक्षवेलीवर दिसून येतो.
ऍन्टिस्ट्रेस या विद्राव्य पॉलिमर प्रकारच्या घटकाचा प्रकाश संश्लेषणावर काही परिणाम न होता रोगांना अटकाव होतो, तसेच उर्त्सजन काही प्रमाणात कमी होऊन ताण परिस्थितीत अन्ननिर्मिती कायम राखण्यास मदत होते.
"सी विड एक्स्ट्रॅक्ट'च्या दोन मि.लि. प्रति लिटर या फवारणीचा चांगला परिणाम पाहावयास मिळतो. पांढऱ्या मुळीची वाढ होत राहिल्यास वेलीअंतर्गत सायटोकायनीनची पातळी चांगली राहते, त्यामुळे पानांचे कार्य सुरळीत होते. मुळांच्या कार्यक्षेत्रात ह्युमिक ऍसिड सी वीड एक्स्ट्रॅक्ट, तसेच स्लरी वापरल्यास मुळांची वाढ होण्यास मदत होते. यापूर्वीच्या लेखात आपण आच्छादनाचे फायदे पाहिले आहेत. मुळांच्या वाढीसाठी आच्छादनाचा वापर करावा. अनेक वेळा अति काळजीमुळे जास्त प्रमाणात टॉनिकवर्गीय संजीवकांच्या फवारण्या केल्या जातात. त्याचा दुष्परिणाम होऊन पाने कडक होतात व ती फाटण्याचा संभव असतो. अशी पाने पूर्ण क्षमतेने अन्ननिर्मिती करू शकत नाहीत.
प्रकाशसंश्लेषणाची क्रिया 25 ते 30 अंश से. तापमानात चांगली होत असते; परंतु हेच तापमान द्राक्षाच्या इतर वाढीस योग्य असते असे नाही. प्रकाश संश्लेषणाची क्रिया 30 अंश से.पेक्षा जास्त तापमानात मंदावते व 45 अंश से. तापमानास ती शून्य होते. सामान्य परिस्थितीमध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाशात असलेल्या वेलींच्या पानांचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा 0.5 अंश से. ते पाच अंश से. फरकाने असू शकते.
वेलीवरील फुटी व पानांच्या संख्येमध्ये, तसेच रचनेमध्ये इच्छित बदल घडवून आणल्याने प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा होते, किंबहुना विस्तार व्यवस्थापनाचे प्रथम ध्येय हे वेलीची अन्ननिर्मितीची प्रक्रिया वृद्धिंगत करून एकंदर उत्पादन वाढविणे हेच असते. त्यामुळे पानांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने उपलब्ध सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करून घेणे आवश्यक ठरते.
प्रकाश संश्लेषणाचा दर अभ्यासता सावलीतील पानांमधील दर 25 ते 50 टक्क्यांनी कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जास्तीच्या कॅनोपीमुळे पाने एकमेकांवर आडवी आल्यामुळे तळातील पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोचू शकत नाही, त्यामुळे खालची पाने पिवळी होतात. अशी पाने अन्ननिर्मिती करू शकत नाहीत. वेलीवर ती परजीवी म्हणूनच वाढत असतात. अशी पाने काढून टाकावी.
अशी परिस्थिती सर्वसाधारणपणे बावर प्रकारच्या वेल विस्तार व्यवस्थापनात आढळून येते. म्हणूनच पानांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी वेलीचे विस्तार व्यवस्थापन हे सर्वाधिक उपयुक्त भौतिक माध्यम आहे. पानांच्या अन्ननिर्मितीवर परिणाम करणाऱ्या या सर्व घटकांचा विचार करून अधिकाधिक उत्पादनासाठी त्यांचा उपयोग करून घेणे शक्य होते.
संपर्क : डॉ. रामटेके - 9422313166
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/7/2023
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोप...
कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावा...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...