फळझाडांची पहिली दोन-तीन वर्षे चांगली वाढ होण्यासाठी वर्षातून तीन वेळा म्हणजे जुलै, सप्टेंबर व जानेवारीत गोलाकार पद्धतीने रासायनिक खते द्यावीत. यात सुरवातीला अमोनिअम सल्फेट 50 ते 100 ग्रॅम वयोमानानुसार प्रति झाड सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात द्यावे. नंतर जुलैत युरिया 50 ते 100 ग्रॅम वयोमानानुसार निंबोळी पेंडीबरोबर खोडापासून अर्धा फूट अंतरावर आळे पद्धतीने द्यावा, म्हणजे शाकीय वाढ चांगली होईल. विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे पूर्ण वाढलेल्या झाडांना रासायनिक खतांची मात्रा द्यावी. जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास शिफारस मात्रेत 25 टक्क्यांनी वाढ करावी. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्यास शिफारस खतमात्रा 25 टक्क्यांनी कमी करावी.
आंबा - 1500-500-500 - अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश जुलैत द्यावे. उर्वरित नत्र सप्टेंबरमध्ये द्यावे.
चिकू - 3000-2000-2000- अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश जुलैत द्यावे. उर्वरित नत्र सप्टेंबरमध्ये द्यावे.
पेरू - 900-300-300, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बहराच्या वेळेस द्यावे. उर्वरित नत्र फळधारणेनंतर द्यावे.
डाळिंब - 625-250-250, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बहराच्या वेळेस द्यावे. उर्वरित नत्र फळधारणेनंतर द्यावे.
अंजीर - 900-250-275, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बहराच्या वेळेस द्यावे. उर्वरित नत्र फळधारणेनंतर द्यावे.
कागदी लिंबू - 600-300-600, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बहराच्या वेळेस द्यावे. उर्वरित नत्र दोन हप्त्यांत सप्टेंबर व जानेवारीत विभागून द्यावे. खतांचा वापर माती परीक्षणानुसार करणे गरजेचे आहे.
1) सेंद्रिय खतांचा वापर दरवर्षी बहराच्या वेळी व ताण संपल्यानंतर पहिले पाणी देण्याअगोदर करावा.
2) बागांमध्ये हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा.
3) बहरानंतर उर्वरित अर्धे नत्र मात्रेबरोबर निंबोळी पावडरचा वापर करावा.
4) सरळ खतांच्या वापरासाठी एक किलो नत्र देण्यासाठी 2.17 किलो युरिया, एक किलो फॉस्फरस ऑक्साईड देण्यासाठी 6.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे, तर एक किलो पालाश देण्यासाठी 1.67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावा.
5) माती परीक्षणाद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास सेंद्रिय खतांद्वारे अथवा शेणाच्या कुजवलेल्या रबडीबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खत बहराच्यावेळी मातीतून द्यावे, तसेच फूल व फळधारणेच्यावेळी फवारणीतून द्यावे.
6) बागेत सूत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळल्यास झेंडूची लागवड करावी.
- डॉ. अनिल दुरगुडे, 9822598964
मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
-----------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.