অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फुलशेतीला मिळतेय चालना

फुलशेतीला मिळतेय चालना

फुलशेतीत महाराष्ट्राचे स्थान चांगले आहेच, मात्र मागणीची गरज लक्षात घेऊन विविध राज्यांत फुलशेती चांगलीच बहरू लागली आहे. अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी या फुलशेतीने सावरली आहे. फुलशेतीची ही छोटी झलक.

झारखंड

झारखंड राज्यात जैवविविधता भरपूर प्रमाणात आहे. या राज्यात गुलाबांच्या विविध जातींचा नजराणाही पाहण्यास मिळतो. गाऱ्हवा जिल्हा तर त्याच कारणासाठी राज्याचे आकर्षण ठरत आहे. ब्रिजेश तिवारी या शेतकऱ्याच्या बागेत तर फुलांच्या शंभरहून दुर्मिळ, नेहमीच्या व हंगामी जाती पाहण्यास मिळतात. त्यात गुलाबांच्या जातींचाही समावेश आहे. तिवारींच्या या प्रयत्नांमुळे अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. तिवारी म्हणतात, की या शेतीत गुंतवणूक कमी आहे. तुम्हाला या शेतीतून वेगळा आनंदही मिळतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांना मागणीही वाढते आहे. या शेतीत अधिकाधिक शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज असल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे. गाऱ्हवा जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात तिवारी यांच्या फुलांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यातही आले आहे. त्याचबरोबर बिरसा कृषी विद्यापीठानेही त्यांचा सन्मान केला आहे.

त्रिपुरा


हे अननस व रबर लागवडीसाठी प्रसिद्ध राज्य आहे. आता फुलशेतीसाठीही हे राज्य आपली ठळक ओळख निर्माण करताना दिसत आहे. येथील शेतकऱ्यांचे अनुभवही लक्षात घेण्यासारखे आहेत. चित्तरंजन नावाचे शेतकरी म्हणतात, की भाजीपाला पिकांच्या तुलनेत फुलशेती अधिक फायदेशीर असल्याचे आम्हाला जाणवले आहे. गेल्या पाच वर्षांपासून मला फुलशेतीचा अनुभव आहे. आम्हाला सरकारकडून अनुदानावर रोपे मिळाली. त्यानंतर आम्ही या तंत्रात कुशल झालो आहोत. आमच्या राज्यात फुलशेतीला मिळत असलेली चालना शेजारील मिझोराम, नागालॅण्ड व मेघालय या राज्यांना प्रेरक ठरत आहे. दीपक नावाचा शेतकरी म्हणाला, की फुलशेतीमुळे माझ्या कुटुंबाची आर्थिक घडी चांगली बसली आहे.

जम्मू-काश्‍मीर


जम्मू व काश्‍मिरात फुलशेती चांगलीच बहरली आहे. तेथील सरकारची फूल उत्पादकांना सर्वतोपरी मदतही मिळत आहे. तेथील सरकारने प्रत्येक तालुक्‍यात मार्केटिंग सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री श्‍यामलाल शर्मा याविषयी बोलताना म्हणाले, की तालुका स्तरावरच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची ही योजना असल्याने त्यांना दूरचा पल्ला गाठावा लागणार नाही. राज्यात फळपिके, फुलशेती, पोल्ट्री, मत्स्यशेती, पशुसंवर्धन इ. घटकांना मोठा वाव आहे. युवा शेतकरी झेंडू, तसेच कोरफडसारख्या पिकांची शेती करण्यासाठी पुढे येऊ शकतात. कोरफडीच्या शेतीसाठी सरकारने अनुदान देऊ केल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate