অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बाटलीबंद पाणी उद्योग – एक अनावश्यक गरज

प्रस्तावना

बाटलीबंद पाण्याचा वापर आता प्रतिष्ठेचा विषय राहिलेला नाही. त्यामुळेच बाटलीबंद पाणी न वापरणे हे काही कमीपणाचे लक्षण मानले जात नाही. वस्तुस्थिती अशी आहे की बाटलीबंद पाण्याचा वापर ही आपल्या जीवनातील“एक अनावश्यक गरज” झालेली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे जगात निदान अजुन तरी असे उपाय नाहीत की ज्यायोगे कोणत्याही व्यक्तिला जेथे वाटेल त्या जागी मुबलक पाणी वापरावयास मिळेल.आज जर आपण आपल्या घराबाहेर पडलो व रस्त्यात तहान लागली तर पिण्याचे पाणी कोण देणार? निदानभारतात बर्‍याच कालापर्यंत “पाणपोई” ही संकल्पना अस्तित्वात होती. पण “पाणपोई” ही काही “पायाभूत सुविधा” या सदरात येणे शक्यच नाही. शहरांतर्गत किंवा जवळपास “पाणपोई” शक्य आहे पण एका गावाहून दुसर्‍या गावी जाताना निर्जन रस्त्यावर हे कसे शक्य आहे? तेथे पाणी कोण व कसे पोचवणार? पाण्याचा दर्जा हा विषय तर दूरच राहीला.

नेमके याच कारणांमुळे बाटलीबंद पाणी गरजेचे झाले आहे.पण हे ही तितकेच खरे आहे की त्यामुळेप्लॅस्टिकचा अती वापर व कचरा ही समस्या वाढली आहे.तसेच भुजलाचा अमर्याद उपसाही पण समस्या निर्माण झाली आहे.

थोडक्यात सांगायचे तर बाटलीबंद पाणी हा एक “धरले तर चावते¸ सोडले तर पळते”असा मुद्दा झालेला आहे. याकडे वळण्यापूर्वी प्रथम आपण बाटलीबंद पाणी या विषयी जास्तीत जास्त माहिती मिळवू.

  1. भारतीय बाटलीबंद पाणी उदयोगाची 201213 ची एकूण उलाढाल रू.10¸000 कोटी इतकी आहे. दरवर्षी ही उलाढाल सुमारे 19 टक्केने वाढत जाते. यानुसार ती 2015 मध्ये रू.15¸000  कोटी पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे.
  2. “बाटलीबंद पाणी” उद्योगाची जागतिक उलाढाल 201213 मध्ये 8500 ते 9000 कोटी डॉलर इतकी आहे. मागच्या 5 वर्षात या उदयोगाची सुमारे 40 ते 50 टक्के वाढ झालेली आहे.
  3. “बाटलीबंद पाण्याचा” वापर अमेरीकेत दरडोई दरवर्षी 42 लिटर तर युरोपात 111 लिटर इतका आहे. भारतात तो 0.5 लिटर (फक्त अर्धा लिटर) आहे अशी आकडेवारी आहे. भारतात 2010–11 दरम्यान दरडोई दरवर्षी 11 लिटर पाणी वापरले गेले असे संदर्भ आहे. तसेच 2011–12 या वर्षात यामध्ये सुमारे 21 टक्के ची वाढ झाली असेही संदर्भ आहेत. पण हे काही खरे नाही. साधे गणित आहे. जर 2012–13ची उलाढाल एकुण121 कोटी जनतेच्या माथी मारली तर या वर्षी प्रत्येक भारतीयाने 82.65 रू.चे पाणी प्यायले असे उत्तर येते व सरासरी 12 रू. लिटर प्रमाणे दर भारतीयाने 6.89 लिटर पाणी प्यायले हे समजते.
  4. भारतातील “नामांकित” व संघटीत क्षेत्रातील “बाटलीबंद पाणी” उद्योग हा एकुण उद्योगाचा 40 टक्के आहे. याचा अर्थ उरलेले 60 टक्के “बाटलीबंद पाणी” हे विशेष प्रसिध्द नसणार्‍या कारखान्यांमधे उत्पादित केले जाते. असा असंघटीत उदयोग एकुण उदयोगाच्या 60 टक्के असणे हे फारच धोक्याचे आहे.
  5. भारतीय बाटलीबंद पाणी हे खरे तर दर्जाच्या बाबतीत फारच वादग्रस्त आहे. ‘कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटी’ या अहमदाबादच्या सेवाभावी संस्थेने तपासणी करून असा निष्कर्ष काढला आहे की बाजारपेठेतून कोणत्याही ब्रँडच्या बाटल्या डोळे झाकुन उचलून आणल्या व तपासल्या तर अशा 13 वेगवेगळया ब्रँडपैकी 10 ब्रँडच्या बाटल्यात चक्क अनावश्यक घटक तरंगताना दिसतात. म्हणजे तपासणीस आणलेल्यापैकी 76.9 टक्के पाणी पिण्यास अयोग्य असते. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आरोग्य समितीचे चेअरमन श्री.मंजुनाथ रेड्डी यांनी अचानक सुचना न देता बंगलोरमधील 2 बाटलीबंद पाण्याचे कारखाने दि.11जाने 2011 ला तपासले. या कारखान्यात “मिनरल वॉटर” च्या नावाखाली चक्क नळाचे पाणी सरसकट भरले जात होते. इतकेच नव्हे तर याच कारखान्यात असे नळाचे पाणी भरलेल्या बाटल्यावर इतर कंपन्यांच्या नावाची लेबले लावली जात होती. चक्क “नळाच्या पाण्याचा” “डुप्लिकेट” धंदा चालू होता. स्थायी समितीच्या सदस्यांनी भेट दिली व तेथे तर मिनरल वॉटर हे साध्या पाण्यात मिसळुन चक्क भेसळीचा धंदा चालला असल्याचे उघडकीस आणले. इतकेच नव्हे तर आय एस आय हे चिन्ह लावणे अभिप्रेत असुनही तसे कोणत्याही बाटलीवर लावले जात नव्हते. थोडक्यात म्हणजे¸ आपण समजतो तसे बाटलीबंद पाणी हे आरोग्यास योग्य असे नसतेच व नळाच्या पाण्यापेक्षा त्याचा दर्जा हा अजिबात जास्त नसतो.
  6. हीच कथा जगात इतरत्र पण खरीच आहे. जगातील फक्त 35 टक्के ग्राहकांचे असे म्हणणे आहे की बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा खरोखरच आरोग्यदायी असते. हे जर खरे असेल तर मुळातच बाटलीबंद पाण्याची खरोखरीच गरज आहे काय ? अमेरिकेत तर बाटलीबंद पाण्याचा वापर प्रचंड वाढत चाललेला आहे.2011 मधे अमेरिकेत 910 कोटी लिटर ‘110.53 लिटर दरडोई´ एवढे बाटलीबंद पाणी विकले गेले. आजपर्यंत दरवर्षी झालेल्या वार्षिक विक्रीपेक्षा हे कितीतरी जास्त प्रमाण होते. अमेरिकेतील ग्राहक हा या भाबडया समजुतीत आहे की आपण पित असलेले बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्यापेक्षा फारच स्वच्छ आरोग्यदायी व स्फुर्तीदायक आहे. खरे तर अमेरीकेतील नळद्वारे पाणी पुरवठा हा जगातील सर्वात स्वच्छ समजला जातो. तेथे ही कथा आहे - तरी पण तेथे बाटलीतील पाण्याचा धंदा हा तेजीत आहे. याचा अर्थ स्वच्छ आहे. बाटलीबंद पाणी ही गरज नसून उद्योजक व व्यापार्‍यांनी अत्यंत व्यवस्थित योजना करून निर्माण केलेले एक अवडंबर आहे. त्यामुळे तेथेच हळूहळू नळाचे पाणी पिण्यास अयोग्य आहे असे समजणारी पिढी व नवा वर्ग उदयास आलेला आहे. आज तेथे दर पाच व्यक्तीपैकी एक व्यक्ती बाटलीबंद पाणीच पिते. याचाच अर्थ असा की दिवसेंदिवस आपण निसर्गावर अवलंबून न रहाता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या पाण्यावरच अवलंबून आहोत. या बहुराष्ट्रीय कंपन्या पाण्यासारखा संपणारा नैसर्गिक स्त्रोत प्रचंड नफेखोरी करीत आपणांस विकत आहे. त्यांनी केलेल्या चकचकीत जाहिरातीचा मारा व यामुळे झालेली ही कमाल बरेच काही बोलून जाते. पण लक्षात कोण घेतो ?
  7. इतकी प्रचंड उलाढाल व समाज मान्यता असून ही खुद्द अमेरिकेत सुध्दा दरवर्षी एकूण विकले गेलेले बाटलीबंद पाणी हे प्रत्यक्षात नळाद्वारे पुरविलेल्या पाण्याच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. अमेरीकेत नळाद्वारे सरासरी100 कोटी गॅलन (379 कोटी लीटर) पाणी दर तासाला वर्षातील 24 तास असे वर्षभर पुरवले जाते. वर्षभरात विकलेले एकुण बाटलीबंद पाणी हे अमेरिकेतल्या कोणत्याही एका दिवशी फक्त 9 तास केलेल्या नळाच्या पाणीपुरवठयाएवढेच आहे. याचा अर्थ खुद्द अमेरीकेतच अशा पाण्याची बाजारपेठ ही नगण्य आहे व चिमुटभर ग्राहकांच्या भ्रामक कल्पनांमुळे पोसली जात आहे. मग भारत देशाच्या दृष्टीने आपण अशा पाण्याची आपल्याला तरी गरज का भासावी ?
  8. भारतात मुठभर श्रीमंत आपल्या चोचल्यांसाठी बाटलीबंद पाणी वापरतात. गरीब व पाण्यासाठी मोताद झालेले लोकांना असे पाणी परवडूच शकत नाही. त्यांची गरज पाण्याचा टँकर भागवतो.
  9. सर्वात मोठा विरोधाभास हा आहे की या उद्योगाला भूजल / पाणी हा कच्चा माल जवळपास फुकटच मिळतो. पणविक्री किंमत मात्र 1900 पट (190000 टक्के) असते. हा उदयोग केवळ साध्या सोप्या सुमार तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात ''हाय - टेक'' असे काहीही नाही. पण इतके असुनही हा उद्योग समाजाची मुलभूत गरज भागवतो व यात महाप्रचंड अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. हे खरे आहे की वरील 1900 पट विक्री किमतीत वाहतूक खर्च किरकोळ विक्रेत्याचा नफा वजा जाता उत्पादकाच्या हातात फार फार तर 10 ते 15 पट नफा (% नव्हे) शिल्लक रहातो. पण हे पण इतर उद्योगांच्या तुलनेत फारच झाले. याशिवाय ग्राहकास पाण्याची अवाच्या सव्वा किंमत द्यावी लागते त्याचे काय ?
  10. आश्चर्याची गोष्ट अशी की लोक या पाण्यासाठी 12 रू.प्रती लिटर ही किंमत देण्यास तयार होतात. ज्या पाण्याची खरी किंमत फक्त 0.25 पैसे प्रति लिटर असते. (यात कामगारांचा खर्च धरलेला नाही पण ही किंमतच 4800पट आहे.) अमेरिकेत ''Think Outside the Bottle” ही चळवळ सुरू झालेली आहे. याच्या वेबसाईटवर तर जाहीर केले आहे की 40 टक्के बाटलीबंद पाणी हे निव्वळ नळाच्या पाण्यापासूनच भरलेले असते.
  11. यामधे नुसते बाटलीबंद पाणी उद्योजकच सामील नाहीत. दक्षिण भारतात हजारो इंधन वाहू ट्रक चक्क पाण्याच्या टँकरचे काम करतात आणि घरोघरी भूजल अथवा नळाचे पाणी पुरवतात. फरक इतकाच कि ते भरमसाठ किंमत मागत नाहीत (रू.500 ते 550 प्रती 5000 लिटर). 13000 पेक्षाही जास्त पाण्याचे टँकर चेन्नईच्या आजुबाजूच्या शेतजमीनीतील भूजल उपसा करून चेन्नई गावात पुरवतात. भारतात टँकर उद्योगाची सुमारे 800 ते 900कोटी रू. ची पाणीपुरवठा उलाढाल नुसती चेन्नईच नव्हे तर दिल्लीत पण आहे. खरे तर टँकरचा पाणी पुरवठा ही आपल्या राज्यकर्त्यांना लाज वाटायला लावणारी गोष्ट आहे पण बाटलीबंद पाण्यापेक्षा केव्हाही बरी.
  12. बरेचसे बाटलीबंद पाणी उद्योग हे भूजलावर अवलंबून आहेत. असे उद्योग ज्या भागात असतात, त्या भूभागातील जलस्त्रोतांवर प्रचंड ताण येतो कारण अशा बर्‌याच भागात भूजल हाच स्थानिक लोकांचा एकुलता एक पाण्याचा स्रोत असतो. या गोष्टीमुळे अशा भागात स्थानिक जनता व बाटलीबंद पाणी उद्योजक यांच्यात संघर्ष निर्माण होतो. भूजलाचा नको तितका उपसा हेच त्याचे खरे कारण असते.
  13. भारतातील खाजगी उद्योग भूजलाचा अमर्याद उपसा तर जवळपास फुकटच करतात, कारण आजही आपल्या देशातील या बाबतचे कायदे जुने पुराणे व काळाशी विसंगत आहे. अजुनही कायदा असे म्हणतो की ''ज्या माणसाची जमीन, तो माणूस त्या जमिनीखालील पाण्याचा मालक''. याचा अर्थ असा की केवळ काही चौरस फुट जमीन विकत घेतली तर त्या जमिनीखालील कितीही पाणी तो फुकट वापरू शकतो. नेमका हाच तो कळीचा मुद्दा जनता व उद्योजक यांच्यामध्ये आहे. यामुळेच उद्योजकाला जवळपास अमर्याद नफा मिळतो.
  14. कोका कोला या कंपनीचेच उदाहरण बघा. राजस्थानमधे काला डेरा या दुष्काळग्रस्त भागात कोका कोलाचा बाटलीबंद पाण्याचा कारखाना आहे. त्यांना सर्व पाणी फुकट मिळते. नाममात्र पाणीपट्टी भरावी लागते, कारण ते आपले सांडपाणी कारखान्याबाहेर सोडतात. असे सांडपाणी सोडण्याची त्यांची 2001-02 मधे पाणीपट्टी रू.5000व 2003 मध्ये रू.24246 इतकीच होती. कोका कोला सुमारे 5,00,000 लिटर पाणी दररोज उपसते. यासाठी त्यांना14 पैसे प्रती 1000 लिटर इतकाच खर्च होतो. साहजिकच 10 ते 12 रू.च्या 1 लिटरच्या ''किनले'' बाटलीबंद पाण्याच्या कच्च्या मालाची किंमत फक्त 0.02 ते 0.03 पैसे प्रती लिटर इतकीच असते. (साधारणतः 1 लिटर बाटलीबंद पाणी बनविण्यासाठी 2 लिटर भूजल हा कच्चा माल लागतो.) राजस्थानातील 80 टक्के जलस्रोत हे अती उपसले गेले आहेत असे भारत सरकारने जाहीर केले आहे. 34 टक्के जलस्त्रोत अत्यंत नाजूक व अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे जाहीर केले आहे. हाच प्रकार इतरत्र पण आहे. दक्षिण भारतात आज पर्यंत सर्वात जास्त बाटलीबंद पाणी उद्योग आहे व एकट्या दक्षिण भारतात बाटलीबंद पाणी उद्योगाचे 50 टक्के पाणी वापरले जाते.
  15. 2004 सालच्या सांख्यिकीनुसार जगात 26,000,000,000 लिटर (26 अब्ज) बाटलीबंद पाणी वापरले गेले. यासाठी28,000,000,000 (28 अब्ज) प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या गेल्या (यात उत्पादन करताना वाया जाणारे प्रमाण गृहीत धरले आहे.) यातील 86 टक्के बाटल्या या कचर्‍यात जमा झाल्या (म्हणजे साधारण दर सेकंदाला 1500बाटल्या) फक्त 14 टक्के बाटल्यांचा पुर्नवापर करण्यात आला असे कंटेनर रिसर्च इंस्टिटयुटचे म्हणणे आहे.28,000,000,000 प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी 17,000,000,000 (17अब्ज) बॅरेल इतके कच्चे तेल लागते. (1 बॅरल कच्चे तेल म्हणजे 42 यु.एस. गॅलन म्हणजेच 158.99 लिटर) या सर्व पाण्याच्या बाटल्या व त्यांची सर्वत्र वाहतूक करण्यासाठी पण इंधन हे लागतेच. खरे तर वरील कच्च्या तेलापासून जरवाहतुकीचे इंधन केले असते तर वर्षाला 1,00,000 कारसाठी इंधन तयार झाले असते. यातून 25,00,000टन इतका कार्बनडाय ऑक्साईड पण बाहेर टाकला गेला. 2013 ची याबाबतीतील आकडेवारी किती असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
  16. 2004 मध्ये जगातील सर्व ग्राहकांनी 100,000,000,000 (100 अब्ज) अमेरिकी डॉलर इतका पैसा फक्त बाटलीबंद पाण्यावर उडवला व तो ही एका वर्षात. या पैशाचा सुयोग्य विनियोग केला असता तर यापेक्षा कितीतरी कमी पैशात सर्व जगात स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठयाची योजना राबवता आली असती.
  17. प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्यात उष्णतेमुळे आपोआपच प्लास्टिकमधील पदार्थाचे विघटन होऊन असे घटक पाण्यात मिसळतात. उदा. बाटलीबंद पाण्याची गोदामे -3.33 डिग्री से. ते 29.5 डिग्री से., ट्रक मधून वाहतूक -37.8 ते 65.55 डिग्री से., मालाची चढउतार करताना 7.22 ते 37.8  डिग्री से., किरकोळ विक्री केंद्र  12.8 ते 65डिग्री से., प्रत्यक्ष ग्राहकाच्या ठिकाणी  -12.8 ते 37.8 डिग्री से. कार वा बंद कपाटात तर याहीपेक्षा जास्त तापमान जाते. कल्पना करा की अशा तापमानाच्या चढउतारामुळे पाण्यात काय काय मिसळत असेल ? असे घटक हे कॅन्सरला कारणीभूत आहेत याची आपल्याला जाणीव आहे काय ?

या सर्व बाबींचा विचार केल्यावर असे लक्षात येते की -

  1. बाटलीबंद पाणी हे नळाच्या पाण्याला गुणात्मक अथवा संख्यात्मक असा पर्याय असूच शकत नाही. बाटलीबंद पाण्याचा वापर हा सर्वत्र नळाच्या पाण्यापेक्षा अत्यंत नगण्य आहे. कदाचित अजूनही भरपुर मागास असणार्‍या देशात व भूभागावर जेथे विकासाची कसलीही लक्षणे अथवा प्रयत्न दिसत नाहीत अशा ठिकाणी तात्पुरता उपाय म्हणुन बाटलीबंद पाणी योग्य असेलही. भारतात तर 60 टक्के बाटलीबंद पाणी हे आरोग्यास चांगले नाही. राहिलेले40 टक्के बाटलीबंद पाणी बहुराष्ट्रीय कंपन्याच विकतात. ज्या कसलेही प्रगत तंत्रज्ञानाशिवाय आपल्या खिशातून आपला पैसा नेतात.
  2. जगभरात व भारतात सुध्दा नळाच्या पाण्याच्या तुलनेत बाटलीबंद पाण्याचा वापर हा अत्यंत नगण्य आहे. पण असे पाणीही एकाच ठिकाणाहून भरपूर प्रमाणार उपसले गेल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या भूजलसाठ्यावर अथवा नळाच्या पाण्याच्या साठ्यावर प्रचंड ताण येतो. खरे तर बाटलीबंद पाणी बनवण्यासाठी नळाचे पाणी वापरू देणे हा शुध्द मुर्खपणा आहे. पण खरा मुद्दा आहे तो प्लास्टिकच्या वापराचा. जर असे पाणी साठविण्यासाठी कच्चा तेलाच्या वापराविना व पर्यावरणपुरक पदार्थाचा वापर करून त्यापासून जर बाटल्या अथवा पिशव्या निर्माण करता आल्या तर निदान असे पाणी हे बर्‍याच प्रमाणात गरजुंसाठी उपयुक्त तरी ठरेल.
  3. भारतातील गोरगरीब व खेडेगावातील जनतेसाठी हा उद्योग तर काहीही उपयोगी नाही कारण यातील कोणीही भरमसाठ किंमतीला असे बाटलीबंद पाणी विकत घेऊ शकत नाही.
  4. हा उद्योग शेतीसाठी व पिण्यासाठी लागणारे पाणी पळवतो व भूजल स्रोतांवर व त्यायोगे स्थानिक पर्यावरणावर आघात करतो.
  5. या उद्योगामुळे प्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होतो.
  6. या उद्योगाद्वारे जगभरात प्रचंड प्रमाणात CO2 निर्माण होतो व वातावरणात सोडला जातो.
  7. बाटलीबंद पाणी उदयोगात कसलेही उच्च तंत्रज्ञान नाही. यामुळे उत्पादनात खरोखरीच मुल्यवर्धन होत नाही. पण तरीही जवळपास फुकटच मिळणार्‍या कच्च्या मालावर भरमसाठ नफा घेण्याची संधी यात आहे. बाटलीबंद पाण्याबाबत स्वच्छतेची कसलीही हमी नाही. केवळ मुठभर लोकांचे चोचले पुरवणे एवढेच यामधे साध्य होते. असा उद्योग काय कामाचा ? खरे तर हा सर्व उद्योग हा बाजारपेठांच्या नियमांशी पूर्णपणे विसंगत आहे व त्यामुळेच अनावश्यक आहे व धोकादायक पण आहे. हया उद्योगाची खरी जननी म्हणजे सरकाचा नाकर्तेपणा !

या सर्व बाबींचा विचार केल्यावर खालील उपाय सुचवावेसे वाटतात -

  1. देशांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांचे रक्षण करण्यासाठी देशातील नव्याने उभे रहाणारे बाटलीबंद पाणी उद्योग बंद करावेत. असाच प्रकार आपण गुटखा व प्लास्टिकच्या पिशव्यांच्या बाबतीत केलेला आहे.
  2. आज सुरू असणारे बाटलीबंद पाणी उद्योग बंद करण्यासाठी साधारणतः 10 वर्षाचा कालावधी द्यावा. याशिवाय, विद्यमान कर व शुल्क आहे तसेच ठेवून सरकारने प्रत्येक बाटलीबंद पाणी उद्योग करणार्‍या कंपनीबरोबर50 टक्के महसूल वाटून घेण्याचा करार करावा. या योगे सरकार त्यांच्या नफ्यात पण वाटेकरी होईल. इतके असूनही या उद्योगातून उद्योजकाला सुयोग्य नफा मिळेलच मात्र तो भरमसाठ नसेल. यांचा फायदा असा की अकारण भरमसाठ नफेबाजी करणार्‍यांच्या शिडातील हवा काढून घेतली की आपोआपच या धंद्याला उतरती कळा लागेल. दहा वर्षाच्या कालावधीनंतर मात्र देशातील सर्व बाटलीबंद पाणी उद्योगावर सर्वकष बंदी घालावी. दहा वर्षाचा कालावधी नक्कीच इतका मोठा आहे की नुकत्याच गुंतवणुक केलेल्या उद्योगाचेही नुकसान होणार नाही. सरकारने बाटलीबंद पाण्यातून मिळालेल्या महसुलातून जनतेस पाणी पुरवठा होईल अशा योजना राबवाव्यात. एखाद्या NGOने अशा कडक उपाययोजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करावा.
  3. NGO किंवा सरकारने देशांतर्गत प्रचंड प्रमाणात करून बाटलीबंद पाण्याचे उद्योगाचे खरे स्वरूप व त्याचापर्यावरण व जनजीवनावर होणारा आघात जनतेसमोर आणावा. सुदैवाने 60 ते 50 टक्के जनतेस हे माहितच आहे. उरलेल्या 35 ते 40 टक्के ग्राहकांना या विषयाचे गांभीर्य व यातील फसेवगीरी समजलीच पाहिजे. ज्यायोगे त्याचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे.
  4. सरकारी संस्था, निमसरकारी संस्था व सेवादले व सरकारच्या अखत्यारीतील सर्व उपक्रम, योजना यांनीबाटलीबंद पाणी वापरावर बहिष्कार घालावा. जनतेच्या पैशातून कोठेही बाटलीबंद पाणी वापरले जाणार नाही याची तजवीज करावी.
  5. पर्यावरणपूरक पदार्थांपासून पाणी साठवण्याच्या पिशव्या अथवा बाटल्या बनवण्याच्या संशोधनात पैसा ओतावा. मध्यंतरी केळीच्या सोपटाचा वापर करून असे पर्यावरणपूरक प्लास्टिक बनवतात येते असे काही प्रयोग जाहीर झाले होते. याचा पाठपुरावा करण्यात यावा. जर असे झाले तर मात्र लोक स्वतःहून पुढे येतील व त्यायोगे स्वतःचे पाणी स्वतःच आणतील.
  6. खरे तर बाटलीबंद पाणी हा काही जनतेस आवश्यक प्रकार नाही. त्यामुळे त्यावर बंदी आणली तर जनतेचे कसलेही नुकसान होणार नाही किंवा जनतेस त्रास होणार नाही. सर्वजण आपापल्या पध्दतीने सर्वांची सोय बघून घेतील. पुर्वीसारख्या गावोगावी पाणपोया सुरू होतील. जवळपासच्या हॉटेलमधून लोकांसाठी नळ उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. जनता पुर्वीसारखी स्वतःच्या स्टीलच्या किंवा काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून प्रवास करू शकेल. इतकेच नव्हे तर प्रवासात वापरात येतील असे मातीचे खोजे / माठ पण जास्त निर्माण होतील.
  7. पर्जन्य जलभरण (Rain Water Harvesting) योजना देशभर सक्तीच्या करण्यात याव्यात.
  8. प्रत्येक शहरात निर्माण झालेले सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यात यावेत. यातून स्वच्छ झालेले पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी व असे पाणी शेतीसाठी व उद्योगधंद्यासाठी पुरवावे. हे पाणी कोणत्याही परिस्थितीत नदीत सोडण्यात येऊ नये. शेतीला असे पाणी नक्की उपयुक्त आहे. उद्योग धंद्यांनी गरज असल्यास स्वतःसाठी लागेल तेवढा शुध्दीकरण प्रकल्प बांधुन स्वतःच्या पाण्याची गरज भागवावी.

 

लेखक : विश्वास प्र पिटके

स्त्रोत :  मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate