অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची

कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यातील ग्रामीण भागात 1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळी देण्याचा कार्यक्रम ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपुर, गडचिरोली हे जिल्हे वगळता इतर जिल्हयातील ग्रामीण भागात होणार आहे. याविषयी आपण जाणून घेऊया...

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील किमान 24 कोटी 10 लाख (68 टक्के) बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतामुळे होतो. जगात 28 टक्के बालकांना असा कृमीदोष होण्याची शक्यता असते.

जंत होण्याची प्रमुख कारण...

  • वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे.
  • या कृमीदोषांचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो.
  • बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना अशक्त (कमजोर)करणारा आहे.
  • कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण देखील ठरते.

भारतात 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येक 10 बालकामागे 7 बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो व ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्तही असू शकते. तसेच 15 ते 19 वर्षे वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलीमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. भारतामध्ये 5 वर्षांखालील जवळजवळ 50 टक्के बालकांची वाढ खुंटलेली आहे आणि साधारणतः 43 टक्के बालके कमी वजनाची आहेत. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देवू शकत नाहीत. शाळेतही उपस्थित राहू शकत नसल्याने याचा दुष्परिणाम त्यांच्या भवितव्यावर होतो.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश...

01 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व पूर्वशालेय वयोगटातील बालके व शालेय वयोगटातील विद्यार्थी (पटावर असलेली व पटावर नसलेली / शाळेत न जाणारे सर्व 19 वर्षांपर्यंतची मुले व मुली) यांना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राज्य व जिल्हास्तरावर राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसाठी पथके स्थापन करुन 10 फेब्रुवारी 2015 रोजी जंतनाशक दिन व 13 फेब्रुवारी 2015 रोजी मॉप-अप राऊंड दिन यादिवशी शाळा व अंगणवाडी केंद्राना आरोग्य विभागामार्फत भेटी देण्यात येणार आहेत.

1 ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुले-मुली, सर्व शासकीय शाळा/ शासकीय अनुदानित शाळा/ अंगणवाडी केंद्र/ आश्रमशाळा/ खाजगी शाळा स्वेच्छेने या मोहिमेअंतर्गत लाभ घेण्यास तयार असतील तर उपलब्ध जंतनाशक गोळी साठ्याप्रमाणे त्या शाळेतील लाभार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग व शिक्षण विभागाचा सहभाग आहे.

गोळी देण्याची पद्धत...

  • वयोगटानुसार जंतनाशक (अॅल्बेन्डझोल 400 मिलीग्रॅम) गोळी 1ते 2 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना अर्ध्या गोळीची मात्रा देण्यात येते.
  • ही मुले गोळी गिळू शकत नाहीत म्हणून अशा मुलांना या गोळीची पावडर करुन (दोन चमच्यामध्ये गोळी दाबून पावडर करावी) पाण्यासोबत द्यावी.
  • तसेच 2 ते 19 वर्षे वयोगटातील मुला- मुलींना एका गोळीची मात्रा देण्यात यावी.
  • ही गोळी बालकांनी चावून खावी व त्यावर शुद्ध पिण्याचे पाणी प्यावे.
  • शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही प्रत्येक शाळा व अंगणवाडी केंद्रावर केलेली असते.
  • शाळेत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शाळांमधून जंतनाशक गोळी द्यावी. शाळेत, अंगणवाडी व उपकेंद्रात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
  • पाच वर्षांखालील लाभार्थी शाळेत न जाणाऱ्या बालकांना व किशोर/किशोरींना (19 वर्षांपर्यंत) अंगणवाडी कार्यकर्तीने गोळी द्यावी.
  • आजारी असणाऱ्या बालक/ किशोर/किशोरी यांना जंतनाशक दिनी/मॉप-अप दिनी अॅल्बेन्डझोलची गोळी (जंतनाशक गोळी ) देवू नये.
  • तथापि, त्यांना ते पूर्णतः बरे झाल्यानंतर जंतनाशक गोळी वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावी.
  • जंतनाशक गोळी दिल्यानंतर लाभार्थ्यास/विद्यार्थ्यास दोन तास अंगणवाडीत/शाळेत थांबण्यास सांगावे.
  • जेणेकरुन काही संभाव्य विपरित परिणाम झाल्यास ताबडतोब काळजी घेणे सुलभ होईल.

जंतनाशक दिनाबाबतचे पर्यवेक्षण व सनियंत्रण राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये एमडीएअंतर्गत (Lymphatic Filariasis Mass Drug Administration) मोहीम अंमलबजावणी झालेली आहे. ते जिल्हे वगळून राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी होणार आहे.

मोहिमेची अंमलबजावणी होणारे जिल्हे...

सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी व अक्कलकोट तालुका व्यतिरिक्त इतर ठिकाणी ग्रामीण भागात राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठाणे, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनाची अंमलबजावणी करण्यात येणार नाही.

आजचे बालक हे देशाचे भवितव्य असल्याने ते सुदृढ आणि सशक्त असणे गरजेचे आहे. शासनाची राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम ही त्या दिशेने टाकलेले पाऊलच म्हणावे लागेल.

 

लेखक - राजेंद्र सरग,

जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate