आपले शरीर अब्जावधी लहान-मोठया पेशींनी बनलेले आहे. या पेशींना काम करण्यासाठी निरनिराळे पदार्थ लागतात. उदा. साखर ,पाणी ,प्रथिन-घटक,प्राणवायू, जीवनसत्त्वे वगैरे. हे पदार्थ प्रत्येक पेशीपर्यंत पोचवून तिथले टाकाऊ पदार्थ गोळा करुन आणणे हे एक मोठे काम आहे. हे काम रक्ताभिसरण संस्था करते. रक्ताभिसरण म्हणजे शरीरात सर्वत्र रक्ताचे सतत चलनवलन करणे.
रक्ताभिसरणातील प्रमुख काम हृदय करते. आपले हृदय दर मिनिटाला सुमारे 60 ते 80 वेळा आकुंचन-प्रसरण पावून रक्त ढकलते. प्रत्येक आकुंचनाने रक्त ढकलले जाते आणि ते नाडीवर बोट ठेवल्यास कळू शकते. माणूस धावत आला असेल, घाबरला असेल तर ही क्रिया जोरात होते. यामुळे छातीत धडधड जाणवू शकते. हृदय दोन-तीन मिनिटे जरी बंद पडले तरी मृत्यू ओढवतो.
हे रक्तवाहिन्यांचे जाळे (एखाद्या झाडाच्या फांद्यांप्रमाणे) सर्वत्र पसरलेले असते. शेवटी शेवटी अत्यंत सूक्ष्म केशवाहिन्यांतून हे रक्त पेशीसमूहांना पोचवले जाते. पेशींजवळ गेल्यावर पेशी रक्तातील आवश्यक घटक (प्राणवायू, साखर, प्रथिन घटक, क्षार) घेतात. तसेच पेशींमधले टाकाऊ पदार्थ (कार्बवायू) वगैरे) या केशवाहिन्यांत जातात.
अशा रीतीने पेशीपर्यंत शुध्द रक्त जाऊन तेथे ते अशुध्द होते. हे रक्त परत वेगळया रक्तवाहिन्यांमार्फत (नीला) हृदयाच्या वरच्या उजव्या कप्प्यात आणले जाते. तिथून ते खालच्या उजव्या कप्प्यात जाते. तिथून पुढे ते फुप्फुसाच्या जाळयात ढकलले जाते. फुप्फुसाच्या जाळयात श्वासावाटे आलेला प्राणवायू रक्तात शिरतो. तसेच रक्तातला काही अतिरिक्त कार्बवायू श्वासावाटे बाहेर पडतो. हे शुध्द झालेले रक्त नीलांमार्फत परत वरच्या डाव्या कप्प्यात आणले जाते. असे एक चक्र पूर्ण होते. अशी क्रिया सेकंदासेकंदाला आयुष्यभर सतत चालू राहते.
खालच्या डाव्या कप्प्यातून सर्व शरीरात रक्त पोचवायचे असल्याने त्या कप्प्यात आकुंचनाचा जोर व दाब सर्वात जास्त असतो. या दाबामुळे अगदी बारीक जाळयांपर्यत रक्त ढकलले जाते. एखाद्या शुध्दरक्तवाहिनीला जखम होते तेव्हा रक्ताच्या चिळकांडया या दाबामुळेच उडतात. मात्र नीला कापली गेली तर रक्त हळूहळू वाहते त्यातून चिळकांडया उडत नाहीत.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट...
अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलां...
विवाह, रक्तसंबंध किंवा दत्तकविधान आणि एकत्र निवास ...
सन १९९५ साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्...