অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दुष्काळावर केली मात

कोक्कर्णी, भातखाचरांचा तारणहार

केरळमधल्या पलक्क्ड जिल्ह्यातलं एरिमायूर खेडं. त्याजवळच्या पदयेत्ती वाडीची ही कथा. भात हे तिथलं मुख्य पीक. ह्या वाडीवर ६९ कुटुंबं राहतात आणि सुमारे १०० एकरांवर भातखाचरं आहेत. ह्या वाडीवर गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून तीन वर्षांसाठीचा कृषि-जैववैविध्य पुर्नभरण आणि सेंद्रीय खेडे संकल्पनेवर आधारित एक प्रयोग सुरू झाला आहे. केरळ स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आणि थनाल ह्या त्रिवेंद्रममधल्या स्वयंसेवी संघटनेच्या संयुक्त प्रयत्नानं हा प्रकल्प राबवला जातो आहे.

ही भातखाचरं दोन डोंगरांमधल्या खोल दरीमध्ये आहेत. घरं खा-यांजवळ नसून किंचित दूर आणि उंचावर आहेत. येथे दरवर्षी सुमारे १२०० मिमि नैऋत्य मोसमी पाऊस पडतो. थूलवर्षम् म्हणजे ईशान्य मोसमी पऊस बाकी सर्व केरळ राज्यात पडतो, पण इथं जवळजवळ नाहीच.

नेहमीचा दुष्काळ

येथील शेतकरी २ वेळा पावसावर अवलंबून असलेली पिकं घेतात. मात्र दुसर्‍या हंगामातल्या पिकावर नेहमीच दुष्काळाची टांगती तलवार असते. खरं तर ह्या खेड्याच्या पलिकडून मलंपुझा धरणाचा कालवा वाहतो. पण ते पाणीदेखील जानेवारी नंतर बंद होते. कालव्याच्या अगदी जवळ आणि सखल भागात असलेल्या २५ एकरांमधल्या भातखाचरांना तिथले शेतकरी कसंबसं पाणी देऊन जगवतात. पण हे पाणी जास्त अंतरापर्यंत पंपाने वाहून नेणे अशक्य होते. २-३ आठवड्यांसाठी पाण्याची ओढ बसली की वरच्या बाजूला असलेल्या शेतकर्‍यांचं पीक हातचं जातं - हे नेहमीचंच आहे. ह्या वाडीचे रहिवासी पिण्याचं पाणी विहिरीतून घेतात. त्यांपैकी काही विहिरी खाजगी तर उरलेल्या सार्वजनिक आहेत. ह्या विहिरी फेब्रुवारी-मार्चमध्ये कोरड्या पडतात. दहा कुटुंबांनी बोअरवेल खणल्या आहेत.

ह्या डोगरांचा बराचसा भाग खडकमाळ आहे. अभ्यासातून असं दिसलं आहे की ज्या भातखाचरांमध्ये वरच्या थरात माती नसून फक्त खडक आहे ती अक्षरशः भाजून निघतात. काही शेतकर्‍यांनी जमिनींत कोक्कर्णी म्हणजे शेततळी बनवलेली आहेत. आणीबणीच्या प्रसंगी एक-दोन वेळा पुरेल इतकं पाणी त्यांमधून मिळतं. हे शेतकरी कोठूनतरी पंप भाड्यानं आणतात आणि पाणी देऊन पीक वाचवतात

पारंपारिक पाणीसाठा

कोक्कर्णी म्हणजे विहिरीपेक्षा जास्त व्यासाचा पण कुलम् प्रकारच्या तलावा पेक्षा छोटा पाझर तलाव असतो. तळ्याच्या थलकुलम् ह्या प्रकाराशी त्याचं साम्य आहे. वयोवृद्ध शेतकरी जब्बर सांगतात - “आमच्या पूर्वजांनी असे डझनभर तलाव उंचावरच्या जमिनींमध्ये खणले होते-कित्येक वर्षांपूर्वी, अगदी हे मलमपुझा धरण बांधलं जाण्यापूर्वी.”

“हे तलाव उन्हाळ्यातदेखील कधी कोरडे पडले नाहीत. फेब्रुवारी-मार्चमध्ये दुसर्‍या हंगामाचं पीक काढून झालं की त्यांचा उपयोग अंघोळीसाठीसुद्धा होत असे. शिवाय खालच्या पातळीवरच्या भातखाचरंमधला ओलावा टिकवून धरण्यासाठी कोक्कर्णीची मदत होत असे.”

मग गणित चुकलं कुठे? तर “शेतकरी कुटुंबं विभक्त होऊ लागली तशा जमिनींच्या वाटण्या होत गेल्या. जमिनीच्या छोट्या तुकड्यांवरचा ताण ह्यामुळं वाढला. टॅपिओकासारखी पिकं घेण्याला सुरुवात झाली आणि हे बदल कोक्कर्णीच्या मुळावरच आले. ढिली झालेली माती त्यां कोक्कर्णीं मध्ये भरू लागली व ती कालांतराने बूजली. आमच्या पूर्वजांनी इतक्या मेहनतीनं बनवलेल्या ह्या तलावांची आज नावनिशणीसुद्धा कोणाला आढळत नाही.”

साधारण दहा वर्षांपूर्वी गंभीर दुष्काळ पडला आणि शेतकर्‍यांना ह्या कोक्कर्णींची आढवण झाली. पोक्लेन यंत्रांचा उपयोग करून दहाबारा शेतकर्‍यांनी आपापल्या शेतजमिनींजवळ पुन्हा हे तलाव खणले. जब्बरनंदेखील प्रत्येकी १५ हजार रुपये खर्चून दोन तलाव बनवले. “इथली जमीन ढिली आहे. त्यामुळं दरवर्षी तलाव मतीनं भरतात. पूर्वीसारखे ह्या तलावांकडून दहा वर्षं पाणी हवं असेल तर त्या तलावांना दगडी बांधबंदिस्ती करावी लागेल. हा प्रकार भयंकर खर्चिक आहे.” तीनचार शेतकर्‍यांनी अशा दगडी अस्तराच्या भिंती बांधल्यादेखील आहेत. मात्र ह्यांना पर्याय म्हणून पावसाळ्यापूर्वी पहिल्याच हंगामात दगडी भिंतींपेक्षा वेटिवर म्हणजे, झुडुपांच्या ओळी लावणंदेखील शक्य आहे. हा उपाय कमी खर्चात जास्त परिणामकारक असू शकतो. ”

मलमपुझा धरणाचं पाणी न मिळणार्‍या खेड्यांमधून आजही कोक्कर्णी आहेत आणि त्यांमध्ये पाणीही आहे. ह्याच एरिमायूर पंचायतीतल्या कुलिस्सेरी वाडीमध्ये खूप कोक्कर्णी आहेत. कुटुथन्नूर पंचायतीतल्या मुरुदामत्थदम् गावी सुद्धा आहेत.

कोक्कर्णींचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामधून पाणी हळूहळू पाझरत राहिल्यानं मातीच्या वरच्या थरांतला दमटपण टिकून राहतो आणि भूजलाची पातळीदेखील वाढते. संबंधित पर्जन्यक्षेत्रात वरच्या बाजूला असे तलाव खणणं केव्हाही जास्त चांगलं असतं. कर्नाटकातल्या कोगाडु जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या जमिनींच्या वरच्या बाजूला असे तलाव आहेत. मात्र हल्लीच्या दिवसांत लोक भातखाचरांच्या आणि भूजलाच्या दृष्टीनं त्यांना असणारं महत्व विसरू लागले आहेत.

पर्जन्यक्षेत्र खडकाळ असेल तर संबंधित शेतजमिनींच्या वरच्या बाजूस असा तलाव खणावा लागतो. म्हणजे पाझरणार्‍या पाण्याचा फायदा खालच्या बाजूच्या खाचरांना होतो. सर्व शेतकर्‍यांनी असे पाझर तलाव खणले तर भाताच्या दुसर्‍या हंगामानंतर तिथं हरबर्‍यासारख्या द्विदल धान्यांचं पीक घेता येईल.

५ % नमुना

बिहारमधल्या प्रदान म्हणजे प्रधान (प्रोफेशनल असिस्टंस फॉर डेवलपमेंट अ‍ॅक्शन) ह्या स्वयंसेवी संस्थेने अशाच तर्‍हेच्या एका योजनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचं नाव आहे ५% नमुना. प्रदानचे कार्यक्रम संचालक दीन बंधू कर्मकार म्हणतात “पुरुलिया जिल्ह्यातल्या पावसावर घेतलेल्या भातपिकाचं सप्टेंबरमधल्या कोरड्या हवेपासून रक्षण करण्यासाठी ही कल्पना खरं तर पुढे आली. ह्या कोरड्या हवेला हथिया म्हणतात. पाण्याचा जागेवरच उपयोग करून घेण्याच्या ह्या संकल्पनेचा मूलाधार म्हणजे जमिनीच्या प्रत्येक तुकड्यात स्वतःचा पाणीसाठा असला पाहिजे आणि एरवी वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवले गेले पाहिजे. म्हणजे पाण्याचा दूष्काळ असण्याच्या काळात ह्या तलावांत साठवले गेलेले पाणी खाचरांना पुरवता येईल. तसेच हे साठलेले पाणी मातीच्या खालच्या थरांमधून झिरपून त्या क्षेत्रांमधील एकंदर दमटपणाचं प्रमाण वाढवेल.”  
आता पदायत्तीमध्ये जास्त - म्हणजे १२० - दिवसांच्या कालावधीचं पारंपारिक पद्धतीचं पीक दुसर्‍या हंगामातदेखील घेतले जात आहे. ह्या भातखाचरांना दुष्काळाच्या संकटापासून वाचवण्याचे आणखी दोन उपाय म्हणजे कमी कालावधीची पिकं घेणे आणि एसआरआय पद्धत वापरणे. थनालने अगोदरच काही खाचरांमध्ये एसआरआय पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.  
आता, लोकांमध्ये ह्याविषयी जागृती करण्यासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्यानंतर, पदायत्तीचे शेतकरी नवीन कोक्कर्णी बनवण्यात रस दाखवू लागले आहेत. ५० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनींवर १०० टक्के सेंद्रीय पद्धती वापरल्या जात आहेत असे थनाल संस्थेच्या एस. उषा सांगतात. बारा कुटुंबं कोणतीही रासायनिक द्रव्यं न वापरता परसबागेमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन घेत आहेत.
पदायत्ती वाडीची दुसर्‍या स्वातंत्र्याकडे संथपणे पण निश्चितपणे वाटचाल सुरू आहे. कोणी सांगावे, येत्या काही वर्षांत पलक्कडमधल्या इतर दुष्काळग्रस्त शेतांसाठी पदायत्ती हे एक आदर्श उत्तर ठरू शकेल...पूर्वपरंपरेमधून आपण नव्यानं काही शिकलो हे महत्वाचं.

 

स्रोत: श्री पाद्रे, पाणी-वार्ताहर, पो. वाणिनगर द्वरा पेरला - केरळ, ६७१ ५५२.

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate