অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रहस्यमय पाथर्डी

रहस्यमय पाथर्डी

वेशीवरच्या पाऊलखुणा : रहस्यमय पाथर्डी

प्राचीन इतिहास लाभलेल्या नाशिकमध्ये अनेक गावे रहस्यमय आहेत. त्यांच्यातील अंतर्गत ऊर्मीमुळे म्हणा अथवा अज्ञात इतिहासामुळे यांची गूढता अनेकांना आकर्षित करते. आपल्या कुशीतील अनोख्या कलाकृतीचे साक्षीदार असलेले गाव कसे वसले अन्‌ त्यानंतर त्या गावात काय काय घडले याचा मात्र अनेकदा उलगडा होत नाही. असेच एक गाव म्हणजे पांडवलेणीच्या कुशीत वसलेले पाथर्डी. कधीकाळी पिशाचीपद्रक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डीचा इतिहास अद्यापही अज्ञातच नाही, तर रहस्यमयही आहे. कधीकाळी पांडवलेणीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले पाथर्डी स्वत:च्याच इतिहासाशी अजूनही अनभिज्ञच दिसते.

नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरांमध्ये पाथर्डी अजून काही वर्षांनी हरवून गेलेले गाव असेल. कारण, त्याच्या अवतीभवतीचा विकासाचा वेग ज्या गतीने सुरू आहे त्याच गतीने पाथर्डीचा अज्ञात इतिहास अधिकाधिक रहस्यमय होत असल्याचे पाथर्डी गाव पाहिल्यावर अनुभवायला मिळते. पाथर्डीतील जुनी घरे अजूनही गावपणाची आठवण ताजी करतात. हे गाव कोणी वसवले याचे उत्तर कोणाकडेही नाही, पण गावात विखुरलेले दगडी कलाकुसरीचे अवशेष गावाचे पांडवलेणीशी (त्रिरश्मी लेणी) असलेले ऋणानुबंध स्पष्ट करतात. गावात प्रवेश केल्यावर हनुमान मंदिर आपले स्वागत करते. या मंदिरातही दगडांचे अनेक अवशेष पाहायला मिळतात. मंदिरातील देवीची लाकडी मूर्ती व विठ्ठल-रुक्मिणीचे लाकडी देवघर आकर्षक आहे. गावात हनुमानाचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. पूर्वी गावात बोहाड्यांचा कार्यक्रम व्हायचा. मात्र, कालांतराने तो बंद झाला. गावात इतरही अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. शाळेमागील एक लहानसे दगडी मंदिर पाथर्डीचा वेगळाच इतिहास सांगते.

दगडी शिळांनी हे मंदिर उभारण्यात आले आहे. या शिळा पांडवलेणीतील असल्याचे मंदिराची रचना चटकन दाखवून जाते. मात्र, या मंदिराचा घुमट मातीचा आहे. हा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. मात्र, मंदिरासमोर उभे राहिल्यावर मंदिरामागे दिसतो पांडवलेणीचा त्रिरश्मी डोंगर. इ. स. पूर्व १०० ते इ. स. ७०० पर्यंतचा इतिहास या त्रिरश्मी डोंगरावर कोरण्यात आला आहे. या बौद्ध लेण्यांचा उल्लेख ‘पंडू लेणी’ असाही केला जातो. यावरून पंडू नावाचा धम्म किंवा धर्म महामात्र असावा अन् त्याने ही लेणी कोरवून घेतली असावी म्हणून याला पंडू अन् त्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन पांडवलेणी म्हटले गेले असावे. ही लेणी पांडवांनी बांधल्याचे म्हटले जाते पण, ते तसे नाही. पांडवलेणीत लेणी क्रमांक तीनमधील शिलालेखात पाथर्डीचा उल्लेख आला आहे तो पिशाचीपद्रक गाव असा.

पिशाचीपद्रकचा अपभ्रंश होऊन पुढे पाथर्डी झाले असावे, असेही म्हटले जाते. मात्र, याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. पांडवलेणी ज्या कारागिरांनी कोरली त्या पाथरवटांनी (दगड कोरून कलाकृती घडविणारे) पाथर्डी वसवली असावी आणि पाथरवट येथे राहत असल्याने त्या गावाला पाथरवटांचे गाव म्हणून पाथर्डी म्हटले गेले असावे. पण, सध्या पाथर्डी गावात शोधूनही पाथरवट सापडत नाहीत अन् तसे असणेही शक्य नाही. कारण, दोन हजार वर्षांपूर्वी पाथरवटांनी वसवलेल्या या गावातून उद्योगधंद्यांसाठी ते बाहेर पडले अन् हळूहळू कधीकाळी समृद्ध असलेल्या या गावात इतर लोक स्थायिक झाले असावेत. कारण, लेणी क्रमांक तीनमध्ये या गावाचा उल्लेख भिक्षुकांच्या खर्चासाठी दान दिल्याचा करण्यात आला आहे. म्हणजे पाथरवटांशिवायही शेतकरी कुटुंबे या गावात विसावली होती. काही असले, तरी पाथर्डीकरांनी पांडवलेणीला वेगळी ओळख मिळवून दिली असे म्हणता येते. कारण प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा आजही पांडवलेणीवर आहेत आणि देशविदेशांतील अभ्यासकांना ही लेणी आकर्षित करतात. विशेष म्हणजे लेणी हा शब्दही जगाला पांडवलेणीनेच दिला आहे. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति...’. ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. धम्माच्या भरभराटीची साक्ष देणाऱ्या बौद्ध लेणीमधील ही एक अनोखी लेणी आहे.

प्राचीन भारताच्या उपलब्ध इतिहासानुसार चंद्रगुप्त मौर्य इ. स. पू. ३२४ मध्ये गादीवर आला. मौर्य, शुंग, कण्ह या घराण्यांनी अनुक्रमे १३७, ११२ व ४५ वर्षे राज्य केले. त्यानंतर सिमुक हा राजा इ. स. पू. ५२ मध्ये गादीवर आला. इ. स. पू. ३० मध्ये त्याने सुशर्मनचा उच्छेद केला. त्यानंतर लवकरच त्याच्या राजवटीचा शेवट झाला. सातवाहन घराण्यातील सिमुक राजाची पुणे, नाशिक, नगर आणि औरंगाबाद या भागात प्रमुख शासन केंद्रे असावीत, असे दिसते. सिमुकनंतर त्याचा धाकटा भाऊ कृष्ण हा राजा झाला. पुराणाच्या संदर्भानुसार कृष्णाने १८ वर्षे राज्य केले. विविध मतांचा विचार केला, तर त्याने इ. स. पू. ३० ते इ. स. पू. १२ या कालखंडात राज्य केले. त्याच्याच कारकीर्दीत नाशिकमधील बौद्ध लेणी खोदण्याचे काम सुरू झाले. मात्र, एकाच राजवटीत ही लेणी पूर्ण झालेली नाहीत. पुढील सहाशे ते सातशे वर्षे याचे काम वेगवेगळ्या राजसत्तांमध्येही सुरू होते. इंग्रज राजवटीत एडवर्ड येस्ट, आर्थर बेस्ट, बर्डे, ओर्लेवार आदींनी इ. स. १८४७ ते १८५३ या काळात सर्वप्रथम नाशिकच्या त्रिरश्‍मी पर्वतावरील या लेण्यांमधील कोरीव लेखांकडे लक्ष वेधले. या लेण्यांपैकी शैलगृह क्रमांक नऊमधील दोन ओळींच्या लेखावरून हे लेणे सर्वांत जुने असल्याचे दिसून येते. पांडवलेणीतील शिलालेखांमधून महत्त्वाची आणि ऐतिहासिक माहिती समजते.

इ. स. पूर्वी १०० वर्षापासून इ. स. १०० वर्षापर्यंतच्या पश्चिम हिंदुस्थानकडील पुष्कळ देशांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे व खेडी अशा इतिहासातील बऱ्याचशा भागांचा खुलासा पांडवलेणी करते. शिलालेखात कण्ह अथवा कृष्ण, हकुसिरी अथवा हकुश्री, क्षहरात आणि नहपान, उषवदात, गौतमीपुत्र सातकर्णी, वासिष्टीपुत्र पुलुमायी, यज्ञश्री सातकर्णी, माधरीपुत्र शिवदत्त आणि ईश्वर या राजांची नावे व वर्णन आढळते. पांडवलेणीत एकंदर २४ लेणी व २६ शिलालेख आहेत. त्यात चैत्य, लयन आणि सत्र असे गुहांमध्ये तीन प्रकार दिसतात. हे लेणे सातवाहन राजा कण्ह (कृष्ण) याच्या कारकीर्दीत त्याचा समण (श्रमण) महामात्राने कोरले. नाशिकच्या या बौद्ध लेण्यांपैकी काही लेणी महाराष्ट्रात सातवाहनानंतर सत्ता प्रस्थापित केलेल्या क्षेत्रपालांनीदेखील कोरलेल्या आहेत. भिक्‍खूंना राहण्यासाठी आणि औषधोपचारांसाठीची तरतूद, दानांचे उल्लेख, युद्ध, तसेच आर्थिक व्यवहाराचे व व्याजाच्या पद्धतीचा उल्लेखही लेणीतील शिलालेखांमध्ये आढळतो.

सातवाहन घराण्यातीलच सर्वश्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने नहापानावर गोवर्धन व गिरणारे परिसरात झालेल्या एका मोठ्या युद्धात विजय मिळविला. हा विजय आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. हा इतिहासही रोमांचक आहे. नाशिक हे स्थलनामही प्रथम म्हणजे २००० वर्षांपूर्वी पांडवलेणीत कोरलेले दिसते. म्हणजेच त्या काळातसुद्धा या शहराचे नाव नाशिकच होते. नाशिकच्या बौद्ध लेणी बौद्ध धम्माच्या भरभराटीच्या काळातील भारतीय समाजव्यवस्था, संस्कृती आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था यांची साक्ष देणारा अमूल्य ठेवा आहेत. ही सफर आणखी रोमांचकारी करायची असेल, तर पांडवलेणीत उल्लेख असलेल्या प्रत्येक राजाची त्या काळातील नाणी चेतन राजापूरकर यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. यातूनही पांडवलेणीच्या अनोख्या इतिहासाची उकल होते.

पाथर्डीच्या अज्ञात इतिहासात आणखी एक संघर्ष दडला आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सक्रिय सहभागी असलेले हे गाव सत्याग्रहींना पोटभर जेवू घालण्यात ही सर्वात पुढे होते. २ मार्च १९३० ला सत्याग्रहाच्या पहिल्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांच्यासह १६ हजार सत्याग्रही सायंकाळी सातच्या सुमारास जेवणासाठी पाथर्डीत आले होते व त्यांच्यासाठी शिऱ्याचे सुग्रास जेवण केल्याचा व त्यानंतर स्पृशांनी अस्पृशांवर किराणा बंदी व त्यांना गावातून बहिष्कृत केल्याचा उल्लेख इतिहासात मिळतो. हा अज्ञात इतिहास सर्वांना समोर यावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. यातून इतिहासालाही नवपालवी फुटेल. काही असो, पण पाडंवलेणी डोंगराच्या टोकावर ठेवलेल्या बेंचवर जाऊन चारही दिशांचा नजारा पाहणे हा एक मनमोहक अनुभव असतो. पांडवलेणी पाहण्याबरोबर पांडवलेणीवरून पाथर्डीचा नजाराही प्रत्येकाला अज्ञात इतिहासात घेऊन जातो.

 

लेखक : रमेश पडवळ

 

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate