पानो हंसदा आता तिच्या बायोगॅस स्टोव्हवर चहा करतांना अभिमानाने सांगते: “आम्ही आता जेवण बनविण्यासाठी बायोगॅस वापरतो. रात्री उजेडासाठी आम्ही सौर उर्जा वापरतो. ही खूपच छान गोष्ट आहे कारण मी आता संध्याकाळीसुध्दा काम करू शकते.” काही महिन्यांपूर्वीच पानो एका बायोगॅस प्रकल्पाची मालक बनली. या प्रकल्पामध्ये शेण, सुकलेली पाने यांसारख्या जैविक टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस तयार होतो ज्याचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. बायोगॅस आणि सौर उर्जेसारख्या नूतनीकरणक्षम उर्जास्त्रोतांच्या वापरामुळे पानोचे दैनंदिन जीवन खूपच सोयीचे झाले आहे, जसे झारखंडमधील चोरा गावातील ग्रामस्थांचे जीवनसुध्दा असेच बदलले आहे. हे गांव यूएनडीपीच्या ग्रामीण भागांसाठीच्या नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतविषयक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या ३४ गावांपैकी एक आहे. हा प्रकल्प झारखंड, उत्तराखंड, राजस्थान आणि सिक्किमच्या दुर्गम भागांतील गावांत राबविण्यात येत आहे.
चोरा गावात घरांच्या छतांवर लावलेले सोलर पॅनेल्स सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आणि गावाला वीज देखील मिळवून देतात. सोलर पॅनेल्समुळे रस्त्यांवरचे दिव्यांनाही वीज मिळते. हे पॅनेल्स लावण्यापूर्वी गावात वीज नव्हती आणि गावकर्यांना प्रकाशासाठी घासलेटच्या (रॉकेलच्या) दिव्यांवर अवलंबून राहावे लागत असे. मात्र आता संध्याकाळ झाल्यावर चोरा गावातील सर्व मुले गावांतील पथदिव्यांखाली एकत्र येतात आणि अभ्यास करतात.
विमलासुद्धा तिच्या स्वयं-सहाय्य समूहातील सदस्यांना नूतनीकरणक्षम उर्जा वापरुन त्यांच्या दैनंदिन घडामोडींमध्ये मदत करण्यात गुंतलेली आहे. “आम्ही तांदुळ दळण्यासाठी 'गॅसिफायर'मधून मिळणारी उर्जा वापरतो. यामुळे आम्हाला पैसे कमविण्यास मदत झाली आहे,” विमला सांगते. गॅसिफायर हे एक यंत्र आहे ज्यामध्ये जैववस्तुमान हे स्वच्छ वायुरूप इंधनात रुपांतरीत होते आणि वीज निर्माण होते. “आधी स्वयं सहाय्य समूहातील स्त्रिया यामध्ये सहभागी होण्यास तयार नव्हत्या पण आता मात्र त्या अगदी सक्रिय सहभाग घेतात,” विमला सांगते. तांदुळ दळून मिळालेले पैसे स्वयं-सहाय्य समूहातील स्त्रिया त्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी राखून ठेवतात. शेतकरी राजेश दुसर्याच एका कारणासाठी गॅसिफायर वापरतो. “आम्ही वीज वापरुन टाकाऊ लाकडापासुन ब्रिकेट्स बनवतो आणि जवळच्याच एका कारखान्याला विकतो. यामुळे मला खूप मदत होते कारण मला कामासाठी कुठेही दूरवर जावे लागत नाही. मी आता घरीच राहून माझ्या शेताकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतो.” ब्रिकेट्स कारखान्यांतील भट्टीमध्ये वापरतात.
झारखंडमधील सराईकेला-खार्सावान जिल्ह्यातील गावात ११० बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामुळे २४०९०० कि.ग्रा. जळाऊ लाकूड वाचण्यास मदत झाली आहे. तसेच यामुळे वर्षाकाठी ३८५४४० कि.ग्रा. कार्बन ( CO2 ) उत्सर्जनही वाचले आहे. हा आकडा २०० भारतीय गाड्या वर्षभरात उत्सर्जित करीत असलेल्या उत्सर्जनाएवढा आहे. प्रकल्प चालू झाल्यापासून ३९२८६ जणांना रोजगारसुध्दा उपलब्ध झालेला आहे.
स्त्रोत: www.undp.org
अंतिम सुधारित : 8/2/2020
जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ ...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...